अंजनगाव सुर्जी-परतवाडा मार्गावर तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:00:47+5:30
नागपूरहून परत येत असताना अंजनगाव-परतवाडा मार्गावर पांढरी खानमपूर येथे स्मशानभूमीजवळ चालक दीपक नळकांडे यांचे कारवरील नियंत्रण सुटले. अपघातात कारचा समोरील भाग चकनाचूर झाला, तर यावले दाम्पत्य व चालक घटनास्थळीच ठार झाले. गंभीर जखमी शुभमला तातडीने अमरावती येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : परतवाडा येथून अंजनगाव सुर्जी$ला परत येणारे चारचाकी वाहन पुलाच्या कठड्यावर धडकल्याने पती, पत्नी व वाहनचालक हे जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री १२ च्या सुमारास पांढरी खानमपूर स्मशानभूमीजवळ घडली.
पोलीस सूत्रांनुसार, सुरेश भीमराव यावले (६३), शीला सुरेश यावले (६०) व वाहनचालक दीपक नळकांडे (३६, रा. सातेगाव) या तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे. सुरेश यावले हे नातेवाइकांच्या एमएच २७ बीई ५८७२ या चारचाकी वाहनाने पत्नीच्या तपासणीकरिता नागपूर येथे गेले होते. सोबत त्यांचा मुलगा शुभम (२४) हासुद्धा होता. नागपूरहून परत येत असताना अंजनगाव-परतवाडा मार्गावर पांढरी खानमपूर येथे स्मशानभूमीजवळ चालक दीपक नळकांडे यांचे कारवरील नियंत्रण सुटले. अपघातात कारचा समोरील भाग चकनाचूर झाला, तर यावले दाम्पत्य व चालक घटनास्थळीच ठार झाले. गंभीर जखमी शुभमला तातडीने अमरावती येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमय मुंडे हे बुधवारी रात्री या मार्गाने अंजनगावकडे येत असताना त्यांना अपघात घडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलीस व आरोग्य यंत्रणेला कळविले. पांढरी खानमपूर येथील युवा वर्गही मदतीसाठी धावला. मृतदेहांचे अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.