अंतिम वर्षांच्या, अंतिम सत्राच्या परीक्षा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST2020-05-09T05:00:00+5:302020-05-09T05:00:41+5:30

यूजीसीने काही दिवसांपूर्वी परीक्षांच्या नियोजनाबाबत समिती गठित केली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यूजीसीच्या गाइड लाइननुसार महाविद्यालयीन परीक्षांबाबत सांघिक निर्णय घेतला आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून, कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी अंतिम वर्षांच्या, अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे.

There will be final year, final session exams | अंतिम वर्षांच्या, अंतिम सत्राच्या परीक्षा होणार

अंतिम वर्षांच्या, अंतिम सत्राच्या परीक्षा होणार

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना दिलासा : यूजीसीची गाईडलाईन, नियोजन १ ते ३१ जुलै दरम्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या उन्हाळी परीक्षांचे नियोजन संबंधित विद्यापीठांना करावे लागणार आहे. १ ते ३१ जुलै या काळात परीक्षा घेण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले.
यूजीसीने काही दिवसांपूर्वी परीक्षांच्या नियोजनाबाबत समिती गठित केली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यूजीसीच्या गाइड लाइननुसार महाविद्यालयीन परीक्षांबाबत सांघिक निर्णय घेतला आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून, कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी अंतिम वर्षांच्या, अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. अंतिम सत्राव्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्यांना पुढील सत्रात प्रवेश दिला जाणार आहे. अगोदरचा परफॉर्मन्स बघून विद्यार्थ्यांना ५०-५० फॉर्म्युलानुसार ग्रेडेशन दिले जाईल. यात काही विद्यार्थी कमी गुण वा नापास झाल्यास त्यांच्या इच्छेनुसार विद्यापीठांना परीक्षा घ्यावा लागतील. एटीकेटीनुसार नवीन सत्रात प्रवेश देण्यात येणार आहे. १२० दिवसांत परीक्षा घ्यावा लागतील. लॉकडाऊन काळातील ४५ दिवसांच्या उपस्थितीबाबत महाविद्यालयांना सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. उन्हाळी सुटी जाहीर करण्याचे अधिकार विद्यापीठांना बहाल केले आहेत. १८ ते २३ जुलै दरम्यान सीईटी घेण्याबाबत निर्णय होणार आहे.

अंतिम वर्षातील ६० ते ७० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करावे लागेल. जुलै महिन्यात परीक्षा घेण्याबाबत निर्णय झाला असून, लॉकडाऊनची स्थिती बघून जून महिन्यात बैठक घेण्याचे संकेत आहे. अंतिम वर्षांच्या, अंतिम सत्राच्या परीक्षा होणारच, हे आता स्पष्ट झाले आहे.
- मुरलीधर चांदेकर
कुलगुरू

‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन व्हावे
१ ते ३१ जुलै या कालावधीत अंतिम वर्षांच्या, अंतिम सत्राच्या परीक्षा घेताना ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर गर्दी होणार नाही. परीक्षा हॉलचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा प्रसंगानुसार घेता आल्यात तरच घ्याव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय समुपदेशन केंद्र
उन्हाळी परीक्षांच्या अनुषंगाने विद्यार्थी, पालकांचे समुपदेशन करण्यासाठी जिल्हानिहाय समुपदेशन केंद्रे असतील. त्यामध्ये परीक्षा, कोरोना विषाणूविषयी माहिती, विद्यार्र्थ्यांच्या मनातील भीती काऊन्सलरच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Web Title: There will be final year, final session exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.