प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्र्याला मातीमोल भाव; खर्च ४४ हजार, उत्पन्न ४० हजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 01:05 IST2020-12-28T01:05:46+5:302020-12-28T01:05:59+5:30
प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्र्याला मातीमोल भाव

प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्र्याला मातीमोल भाव; खर्च ४४ हजार, उत्पन्न ४० हजार
- गणेश देशमुख
अमरावती : एका एकराला ४४ हजार रुपयांचा खर्च आणि ४० हजार रुपयांचे उत्पन्न - हा हिशेब लिहिलाय विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या डायरीत. होय! ‘नागपुरी संत्री’ अशी जगभर ख्याती असलेल्या संत्राफळाचे लाखभर उत्पादक जगायचे कसे, या विचाराने धास्तावले आहेत.
विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा, वर्धा आणि नागपूर या सात जिल्ह्यांत संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. या प्रांतातील १,२६,००० हेक्टर अर्थात ३,१५,००० एकर क्षेत्र संत्रा लागवडीखाली आहे. तज्ज्ञांनुसार, सरासरी एक लाख शेतकरी. अर्थात, सुमारे पाच लाख शेतकरी कुटुंबीय या फळपिकावर अवलंबून आहेत. आंबिया बहराची संत्री दोन महिन्यांपूर्वी विक्रीला आली, तीच मुळी कोसळलेले भाव घेऊन.
का काेसळले भाव?
तुलनेने अधिक उत्पादन झाले. ५० एमएम आकारापेक्षा लहान संत्री (टुल्ली) प्रक्रियेसाठी वापरली जातात. त्यापेक्षा मोठ्या आकाराची खाण्यासाठी (टेबल फ्रुट) विकली जातात. केरळ, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा ही राज्ये ‘टेबल फ्रुट’ची मुख्य ग्राहक आहेत. तेथे सातत्याने पाऊस राहिल्याने मागणी नव्हती. राजस्थान आणि मध्य प्रदेशात संत्रा लागवड क्षेत्र वाढले. त्यामुळे पूर्वी ३० ते ४० हजार रुपये प्रतिटन अशी मागणी असणारी संत्री आज १० हजार रुपये प्रतिटन या भावाने विकली जात आहेत.
प्रक्रिया २०० टनांवर, उत्पादन ५,००० टनांचे
संत्र्याचे दोन बहर आहेत - आंबिया (आक्टोबर ते डिसेंबर) आणि मृग (फेब्रुवारी, मार्च). दोन्ही बहराचे विदर्भातील एकूण सरासरी उत्पादन १२,६०,००० टन आहे. त्यातील ३० टक्के फळे ‘टुल्ली’ असतात.
हल्ली नांदेडच्या एका खासगी प्रक्रिया प्रकल्पात २०० टन प्रति दिवस इतकी संत्री खरेदी केली जातात. विदर्भात दररोज पाच हजार टन संत्र्यांवर प्रक्रिया होईल, इतक्या क्षमतेची प्रक्रिया केंद्रे हवीत.