दहावी, बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 18:19 IST2020-07-09T18:19:32+5:302020-07-09T18:19:53+5:30

दहावी आणि बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ जुलैपासून पाचवीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

Tenth and twelfth classes will start from 5th August | दहावी, बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून होणार सुरू

दहावी, बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून होणार सुरू

ठळक मुद्दे२१ जुलैपासून पाचवीचे ऑनलाईन वर्ग      

लोकमत न्यूज नेटवर्क     
अमरावती : राज्यात आपत्कालीन परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुरू होण्यास अडचणी आल्या आहेत. या परिस्थितीचा सामना करून शिक्षण सुरू करणे गरजेचे आहे. यासाठी दहावी आणि बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ जुलैपासून पाचवीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
सध्याच्या परिस्थितीत शिक्षण सुरू करण्यासंदर्भात गुरुवारी येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी उपसंचालक अंबादास पेंदोर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र आंबेकर यांच्यासह पाचही जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात आली.

ना. कडू म्हणाले, खासगी शाळांनी सर्व वर्ग ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. यामुळे खासगी आणि शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विषमता वाढेल. यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाच्या शाळाही सुरू होणे गरजेचे आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात दहावी आणि बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील एक शाळा सुरू करण्याचे नियोजन करावे. शाळा सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून इतरही ठिकाणच्या शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा अभिप्राय घेण्यात यावा. यासाठी त्रयस्थ म्हणून गावातील सरपंच किंवा समिती सदस्यांची मदत घ्यावी.

पहिली, दुसरी ऑनलाईन शिक्षण घेऊ नका
शासनाने पहिली आणि दुसरीचे ऑनलाईन शिक्षण घेऊ नये, असा निर्णय घेतला आहे. तरीही काही शाळा केवळ शुल्क वसूल करण्यासाठी वर्ग घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, याबाबत अद्याप एकाही शाळेवर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच काही शाळा विद्यार्थ्यांना पुस्तके घेण्यासाठी सांगत आहेत. मनाई असताना काही शाळांतच पुस्तके विक्री करण्यात येत आहेत. यानंतर तक्रार प्राप्त झाल्यास शाळा व्यवस्थापनासह शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही ना. बच्चू कडू यांनी सांगितले.

Web Title: Tenth and twelfth classes will start from 5th August