विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेचा वापर करावा
By Admin | Updated: August 4, 2015 00:04 IST2015-08-04T00:04:31+5:302015-08-04T00:04:31+5:30
विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीसाठी प्रयत्न न करता आपल्या सर्जनशीलतेचा वापर करून नोकऱ्यांची निर्मिती करून राष्ट्राच्या जडणघडणीत हातभार लावावा, ..

विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेचा वापर करावा
विजय भटकर यांचे प्रतिपादन : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ६०९ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वाटप
अमरावती : विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीसाठी प्रयत्न न करता आपल्या सर्जनशीलतेचा वापर करून नोकऱ्यांची निर्मिती करून राष्ट्राच्या जडणघडणीत हातभार लावावा, असे प्रतिपादन विजय भटकर यांनी केले. आजचा अभियांत्रिकीचा विद्यार्थी हा वैश्विक नागरिक म्हणून तयार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संस्था पातळीवरील पाचव्या पदवी प्रमाणपत्र प्रदान समारोहात ते बोलत होते. हा कार्यक्रम संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृहात सोमवारी पार पडला. यावेळी विविध शाखांच्या एकूण ६०९ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे व व गुणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू मोहन खेडकर, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विजय भटकर, सदस्य जी.एन. वानखडे, संजय बांबल, शैक्षणिक अधिष्ठाता सूरज खंते, एन.डी. घवघवे, व्ही.बी. विरूळकर, एस.एस. पुसदकर, प्राचार्य वा.झि. गंधारे आदी उपस्थित होते.
अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मोहन खेडकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अर्जित केलेले ज्ञान समाजाच्या विविधांगी विकासासाठी उपयोगात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यानी केले.
यावेळी विजय भटकर, कुलगुरू मोहन खेडकर यांच्या हस्ते स्थापत्य अभियांत्रिकीचे अभिषेक कुशवाह, यंत्र अभियांत्रिकीचे प्रतीक खवले, विद्युत अभियांत्रिकीचे अजय खर्चे, अणुविद्युत अभियांत्रिकीचे अर्जुन शेंडे, संगणक विज्ञान व अभियांत्रिकीचे अजय खरात, उपकरणीकरण अभियांत्रिकीचे अरविंद दीक्षित, माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीचे आशुतोष किनगावकर या सात विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.
कॉगनिझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन पुणेचे संचालक संजय बांबल यांच्या हस्ते सन २०१४-१५चा उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार यंत्र अभियांत्रिकीचे मंगेश देशमुख व उत्कृष्ट विद्यार्थ्यासाठीचा पुरस्कार स्थापत्य अभियांत्रिकीच्या नितीन देवरे यांना प्रदान करण्यात आला.
सद्यस्थितीत संस्थेमध्ये सात अभियांत्रिकी विद्या शाखांमध्ये पदवी व आठ पदव्युत्तर नियमित व पाच पदव्युत्तर अंशकालीन अभ्यासक्रम आहेत. संस्थेला पीएचडीकरिता विद्यापीठाची संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला सन २००६ पासून स्वायत्तता मिळाली असून जागतिक बँकेच्या तंत्रशिक्षण गुणवत्ता वाढ कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यासाठी संस्थेची निवड झालेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संस्थेचा पदवीदान समारोह लक्षणीय ठरला.
शैक्षणिक अधिष्ठाता सूरजन खंते व सहायक प्राध्यापक क्षितिजा कदम यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व अध्यापक व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)