चार गावांना वादळाचा तडाखा

By Admin | Updated: May 30, 2015 00:38 IST2015-05-30T00:38:04+5:302015-05-30T00:38:04+5:30

जिल्ह्यात काही भागात गुरुवारपासून वादळी पावसाने हजेरी लावली. ...

Storm of four villages | चार गावांना वादळाचा तडाखा

चार गावांना वादळाचा तडाखा

चांदूरबाजार तालुक्यात पाऊस : दर्यापूर-आसेगाव मार्गावर झाडे उन्मळली
चांदूरबाजार : जिल्ह्यात काही भागात गुरुवारपासून वादळी पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सायंकाळी चांदूरबाजार तालुक्यातील चार गावांना वादळाचा जोरदार तडाखा बसला. करजगाव, आलमपूर, गोविंदपूर, कल्होळी येथे जवळपास अर्धा तासपर्यंत वादळाने थैमान घातले.
वादळाच्या तडाख्यामुळे अनेक घरांची छपरे उडाली तर कित्येक घरांच्या भिंतींना तडे गेले. कित्येक कुटूंब यामुळे उघड्यावर आले आहेत. वादळामुळे विद्युत खांब वाकल्याने परिसराचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. मात्र, यामुळे जीवित हानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.
चांदूरबाजार तालुक्यात गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वादळाने थैमान घातले. यात अनेक झाडे उन्मळून पडली. वादळ व पावसामुळे संत्रापिकाचे अतोनात नुकसान झाले. गोविंदपूर येथे २५ घरांवरील टिनपत्रे वादळामुळे उडाली असून कल्होळी, आलमपूर, गोविंदपूर येथेही थोड्याफार फरकाने अशीच स्थिती आहे. करजगावात विवाह समारंभासाठी टाकण्यात आलेला मंडपही वादळामुळे उडाला. वादळाची झळ आम्रवृक्षांनाही बसली असून कैऱ्या खाली पडल्याने शेतकऱ्यांची हानी झाली. तहसीलदार गजानन चव्हाण व तलाठ्यांसह शुक्रवारी सायंकाळपर्यंत तालुक्यातील चारही गावात नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरु होते. मान्सुनपूूर्व पावसाच्या तडाख्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

बुटी प्लॉटमधील पिंपळाचा वृक्ष उन्मळला
शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे बुटी प्लॉट परिसरातील गुरुद्वाराजवळील पिंपळाचे झाड उन्मळून पडले. हे झाड विद्युत तारेवर कोसळून एका घरातील फाटकावर आदळले. माहिती मिळाल्यावर अग्निशमन विभाग व महापालिकेच्या उद्यान विभागाने वृक्ष हटविण्याचे काम सुरु केले होते.

Web Title: Storm of four villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.