एसटी धावणार टोलनाक्याविना !
By Admin | Updated: February 21, 2017 00:13 IST2017-02-21T00:13:12+5:302017-02-21T00:13:12+5:30
कुठल्याही महत्त्वाच्या स्थळी ठराविक वेळेत पोहोचण्यासाठी बसमध्ये बसल्यानंतर किती वेळेत पोहोचणार याचा विचार मनात सुरू होतो.

एसटी धावणार टोलनाक्याविना !
लवकरच ई-टॅग प्रणाली : दर्शनी भागावर असेल विशिष्ट स्टीकर, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयोग
जितेंद्र दखने अमरावती
कुठल्याही महत्त्वाच्या स्थळी ठराविक वेळेत पोहोचण्यासाठी बसमध्ये बसल्यानंतर किती वेळेत पोहोचणार याचा विचार मनात सुरू होतो. पण टोलनाक्यावर एसटीला ब्रेक लागतो. काही वेळेस १५ ते २० मिनिटे सहज जातात. अन् चिडचिड सुरू होते. याला आता खो बसणार आहे. एसटीच्या नवीन ‘ई-टॅग’ प्रणालीमुळे टोलनाक्यावर कोणत्याही अडथळ्याविना एसटी धावू शकणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या शेकडो गाड्या दररोज रस्त्यावर धावत असतात. त्यामुळे एसटीसाठी टोल फ्री करावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. याला अद्याप यश आले नसले तरी एसटीला मासिक पास दिली जात होती. यामुळे दररोज पैसे द्यावे लागत नसले तरी वेळ मात्र जातच होता.
हाच वेळ वाचविण्यासाठी एसटीने ई-टॅग ही आधुनिक प्रणाली अतित्वात आणली आहे. ई-टॅग प्रणाली राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या बसेससाठी उपलब्ध असणार आहे. यामध्ये एसटीच्या दर्शनी भागातील काचेवर विशिष्ट प्रकारचे स्टिकर चिकटवलेले असेल एसटी राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर गेल्यास आहे त्याच वेगात स्टिकर स्कॅन केले जाईल. त्यानंतर त्याची नोंद तेथील संगणकावर केली जाणार आहे. यासाठी बँकेमध्ये आगारनिहाय खाते उघडलेले असेल. या खात्यामध्ये दरमहिन्याला ठराविक रक्कम भरणा केली जाणार आहे. एसटीचे स्टिकर स्कॅन झाल्यावर गाडीच्या नंबरची नोंद होणार आहे. त्यामुळे त्याच क्षणी बँकेच्या खात्यातून ठरलेली रक्कम कापून घेतली जाणार आहे. याचा संदेश तत्काळ विभाग नियंत्रक, लेखाअधिकारी व आगार व्यवस्थापकांना जाणार आहे.
टोलमध्ये दहा टक्के सवलत
ई-टॅग प्रणाली अतित्वात आल्यानंतर पथकराच्या रकमेत दहा टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच अन्य जिल्ह्यातून आलेले वाहन तांत्रिक कारणामुळे बंद पडल्यास त्या वाहनांना पर्यायी वाहन देण्याचे अधिकार संबंधित आगार व्यवस्थापकांना दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रीय महामार्गावर स्वतंत्र लेन
राष्ट्रीय महामार्गावर ई-टॅग लावलेल्या स्टिकरच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन असणार आहे. त्यामुळे रांगेत वाहने उभी करणे, एखादे छोटे वाहन मध्येच शिरल्यास होणारी वादावादी त्यातून मार्ग काढून टोलनाक्याच्या वसुली केंद्रात पोहोचल्यावर पैसे किंवा पास दाखविणे यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे.
मार्गावर धावणाऱ्या वाहनांची नोंद
यासाठी एसटी महामंडळ कोणत्या मार्गावर कोणत्या गाड्या धावणार आहेत याचे नियोजन करून ते राष्ट्रीय महामार्ग विभागाला देणार आहेत. आपत्कालीन अडचण आल्यास पर्याय म्हणून अतिरिक्त वाहनांची यादी दिली जाणार आहे. त्यामुळे अडचणी येणार नाहीत.