पाणीटंचाईवर सरकारी तिजोरीतून तब्बल १९३ कोटी रुपये खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 19:24 IST2017-10-31T19:24:35+5:302017-10-31T19:24:49+5:30
राज्यात यंदा उद्भवलेल्या पाणीटंचाईवर सरकारी तिजोरीतून तब्बल १९३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. सन २०१६-१७ च्या टंचाई कालावधीसाठी ग्रामीण तसेच नागरी भागात पाणीटंचाई निवारणार्थ घेण्यात आलेल्या उपाययोजनांवरील खर्च

पाणीटंचाईवर सरकारी तिजोरीतून तब्बल १९३ कोटी रुपये खर्च
- प्रदीप भाकरे
अमरावती - राज्यात यंदा उद्भवलेल्या पाणीटंचाईवर सरकारी तिजोरीतून तब्बल १९३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. सन २०१६-१७ च्या टंचाई कालावधीसाठी ग्रामीण तसेच नागरी भागात पाणीटंचाई निवारणार्थ घेण्यात आलेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने १९३.२१ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली. त्यातून यंदाच्या पाणीटंचाईने सरकारी तिजोरीवर मोठा भार पडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
सन २०१६-१७ या टंचाई कालावधीत हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांकरिता तसेच या कालावधीतील प्रलंबित देयकांवर हा निधी खर्च करण्यात यावा, असे निर्देश सहा महसूल विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे.
राज्याच्या नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, कोकण व पुणे या सहा महसुली विभागांतर्गत येणा-या जिल्ह्यांतील ग्रामीण तथा नागरी भागात पाणीटंचाई निवारणार्थ अनेक योजना राबविण्यात आल्यात. यात नवीन विंधन विहिरी, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, टँकर तथा बैलगाडीने पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण, विहिरी खोल करणे, गाळ काढणे यांसारख्या उपाययोजनांचा समावेश होता. सहाही महसुली विभागातील ग्रामीण व नागरी भागात सन २०१६-१७ मध्ये राबविण्यात आलेल्या व येणाºया उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी हा १९३.२९ कोटींचा निधी विभागीय आयुक्तांकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. यात कोकण विभागाला ५.६५ कोटी, नाशिक विभागाला २१.२७ कोटी, पुणे विभागाला ३६.८२ कोटी, औरंगाबाद विभागाला ४३.५९ कोटी, अमरावती विभागाला ४३.५३ कोटी, तर नागपूर विभागाला ४२.३९ कोटी रूपये प्राप्त होणार आहेत. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिका-यांना उपाययोजनानिहाय निधीचे वितरण करावे, अशी सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ३० आॅक्टोबरला घेतलेल्या निर्णयानुसार दिली आहे.
अमरावती विभागासाठी अशी आली रक्कम
नवीन विंधन विहिरी - २१६.१६ लाख
नळ योजनांची विशेष दुरुस्ती - १८६४.५० लाख
तात्पुरत्या पूरक नळ योजना - २७३.०९ लाख
टँकर/बैलगाडीने पाणीपुरवठा - ३७३.१२ लाख
विहिरींचे अधिग्रहण - ४१४.६३ लाख
नागरी भागासाठी - २७०.२३ लाख
काटेपूर्णा व खांबोरा बंधा-यापर्यंत - ९४२.०५ लाख
पाइप लाइनद्वारे पाणी
एकूण - ४३५३.७८ लाख