सोयाबीनला फुटले ‘कोंब’
By Admin | Updated: October 5, 2015 00:27 IST2015-10-05T00:27:18+5:302015-10-05T00:27:18+5:30
अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांवर नवीन अरीष्ट कोसळले आहे.

सोयाबीनला फुटले ‘कोंब’
मेळघाटातील आदिवासींसमोर दुहेरी संकट : तालुका कृषी विभाग झोपेत
चिखलदरा : अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांवर नवीन अरीष्ट कोसळले आहे. शेतात सोयाबीनला कोंब फुटल्याने शेतकरी हवालदील झाले असून कृषी विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन असल्याचे संतापजनक चित्र आहे.
चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ-चुरणी परिसरात जवळपास ३५० हेक्टर शेतजमीनीवर आदिवासींनी सोयाबीनची पेरणी केली होती. हे सोयाबीन पीक कापणीला आले असताना उभ्या पिकातील सोयाबीन शेंगामध्ये दाण्यांना अचानक कोंब फुटू लागले आहे. पूर्वीच कमी प्रमाणात पाऊ स झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडले आहेत. अशात सोयाबीनला कोंब फुटू लागल्याने संकट ओढावले आहे.
कोंबामुळे घट
काटकुंभ परिसरातील सोयाबीनला कोंब फुटू लागल्याने एकूण उत्पन्नात घट होणार आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच आर्थिक फटका बसणार आहे. या परिस्थितीतसुध्दा आता घाबरलेल्या शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली असल्याचे काटकुंभ येथील गणेश राठोड, सुधीर मालवीय, शे. इसराईल, राम नोने, चिकाट, सद्दू सुबाजी बेठके, शालीकराम कास्देकरसह आदी शेतकऱ्यांनी सांगितले. काटकुंभ परिसरातील कायलारी पाचडोंगरी, कन्हेरी, तोरणवाडी, बामदेही, कोरडीसह आदी गावांना याची झळ पोहचली. या कोंबामुळे नुकसान होणार असून भरपाई देण्याची मागणी युवक काँग्रेसचे पीयूश मालवीय, राहुल येवलेंसह आदिंनी केली आहे.
काटकुंभ परिसरात सोयाबीन शेंगातील दाण्यांना कोंब फुटल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्यासंदर्भात कृषी तज्ज्ञांसोबत चर्चा करून त्यांना परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी बोलावण्यात येणार आहे.
- गणेश माझेवार, प्रभारी तालुका कृषी अधिकारी चिखलदरा.
चार महिन्यांपूर्वी पेरणी झाली आहे. पीक कापणीला आल्याने असा प्रकार होऊ शकतो. आपण सोमवारी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करू व नंतर कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन शेतकऱ्यांना उपाययोजना सांगू.
- संजय ठाकरे,
मंडळ अधिकारी, काटकुंभ.
परिसरातील सोयाबीन पीक धोक्यात आले असताना कृषी विभागाचा हलगर्जीपणा व कुठलेय मार्गदर्शन नसल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
- गणेश राठोड,
शेतकरी, काटकुंभ.
कृषी विभागाचे दुर्लक्ष
या संपूर्ण प्रकाराबद्दल कृषी विभागाचे अधिकारी पूर्णत: अनभिज्ञ असल्याचे आढळून आले. खुद्द शेतकरी गणेश राठोड यांनी परिसरात सोयाबीन पिकाला कोंब फुटत असल्याची माहिती दिल्यावर येण्याचे सौजन्यसुध्दा दाखविण्यात आले नाही. तीन दिवसांपासून प्रभारी तालुका कृषी अधिकारी गणेश माझेवार, कृषी अधिकारी ठाकरे फिरकलेच नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.