‘झेडपी’त शिवसेना सदस्यांचा वधारला भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:27+5:30
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांचा कार्यकाळ २० सप्टेंबर रोजी संपला. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विद्यमान जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना चार महिन्यांचा बोनस कालावधी शासनाने दिला.

‘झेडपी’त शिवसेना सदस्यांचा वधारला भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात सत्तास्थापनेवरून दरम्यान ज्या प्रकारे भाजप व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे; तोच कित्ता येथील जिल्हा परिषदेत नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या पदाधिकारी निवड प्रक्रियेत गिरवला जात असल्याने राजकीय वर्तुळात रंगत आली आहे. येथे शिवसेना ही किंगमेकरच्या भूमिकेत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या तीन सदस्यांचे भाव चांगलेच वधारले आहेत.
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांचा कार्यकाळ २० सप्टेंबर रोजी संपला. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विद्यमान जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना चार महिन्यांचा बोनस कालावधी शासनाने दिला. अशातच आता पुढील कालावधीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत अध्यक्षपद हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. अशातच आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकाºयांनी जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या ६ जानेवारी रोजी वरील पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेतील दोन सदस्य हे विधानसभेत पोहोचले. जिल्हा परिषद सभागृहाची सदस्यसंख्या ५९ एवढी आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस २६, राष्ट्रवादी काँग्रेस २, रिपाइं १ आणि शिवसेना ३ असे ३२ सदस्यांच्या बळावर काँग्रेस पक्षाच्या हाती सत्ता आहे. त्यामुळे ५९ सदस्यीय जिल्हा परिषदेत आता ५७ सदस्य आहेत. यात काँग्रेसकडे स्वपक्षीय केवळ २६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ असे २८ एवढेच संख्याबळ राहते. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी झाली आहे. त्यामुळे सत्तासोपानाचा मार्ग निश्चित होणार आहे. शिवसेनेने यावेळी जर काँग्रेसची साथ कायम ठेवली, तर सध्या असलेली सत्ता कायम राहू शकते.
एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे भाजप व अन्य विरोधी पक्ष मिळून गणिते जुळविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, यासाठीही शिवसेना सोबत असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. एकंदर सत्तास्थापनेत शिवसेनेच्या तीन सदस्यांची भूमिका राहणार आहे. त्यामुळे सध्या जिल्हा परिषदेत शिवसेना सदस्यांचे भाव वधारले आहेत, हे निश्चित.
पक्षनिहाय बलाबल
काँग्रेस - २६
भाजप - १३
प्रहार - ०५
शिवसेना - ०३
राष्ट्रवादी देशमुख गट - २
राष्ट्रवादी पटेल गट - ३
लढा - १
युवा स्वाभिमान - २
अपक्ष - १
बसपा - १
एकूण - ५७