वाळू तस्करीत महसूल, पोलिसांची साखळी
By Admin | Updated: December 1, 2014 22:45 IST2014-12-01T22:45:34+5:302014-12-01T22:45:34+5:30
नदी, नाल्यातून वाळू उपस्याला बंदी असताना शहरात दरदिवशी सुमारे ५०० ट्रक वाळू शहरात आणली जात आहे. अवैधरित्या वाळू वाहतुकीत महसूल, आरटीओ आणि पोलीस प्रशासनाची साखळी आहे.

वाळू तस्करीत महसूल, पोलिसांची साखळी
दरदिवशी ५०० ट्रक : उपसा बंद तरीही अवैध वाळू वाहतूक सुरू
गणेश वासनिक - अमरावती
नदी, नाल्यातून वाळू उपस्याला बंदी असताना शहरात दरदिवशी सुमारे ५०० ट्रक वाळू शहरात आणली जात आहे. अवैधरित्या वाळू वाहतुकीत महसूल, आरटीओ आणि पोलीस प्रशासनाची साखळी आहे. याप्रकरणी महिन्याकाठी कोट्यवधींची उलाढाल होत असून शासनाच्या तिजोरीला फटका बसत आहे.
जिल्हा प्रशासनाने वाळू उपसा पूर्णपणे बंद केला आहे. तरीदेखील वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात वाळू आणत आहेत, हे वास्तव आहे. तलाठी, तहसीलदार, मंडल अधिकारी, उपविभागीय अधिकारी ते पोलीस ठाणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी असा वाळू तस्करीचा प्रवास आहे. वर्धा नदीतून वाळू उपसा बंद असताना येथून वाळू कशी आणली जाते, हा खरा संशोधनाचा विषय आहे.
येथील फ्रेजरपुरा व वलगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना वाळू तस्करीत किती रक्कम मिळते, याची आकडेवारी विचारली तर डोळे दीपवून टाकणारी आहे.