रस्त्याची चाळण; किती लावणार ठिगळं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:00:39+5:30
संततधार पावसामुळे परतवाडा-अमरावती हा आंतरराज्य महामार्ग पूर्णत: खड्डेमय झाला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व खड्डे भरण्याची डेडलाइन असताना, चाळण झालेल्या रस्त्याला ठिगळं लावायची तरी किती, असा प्रश्न व्यक्त होत आहे. त्यातच संथगतीने सुरू असलेले खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध संताप व्यक्त करणारे ठरले आहे.

रस्त्याची चाळण; किती लावणार ठिगळं?
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : संततधार पावसामुळे परतवाडा-अमरावती हा आंतरराज्य महामार्ग पूर्णत: खड्डेमय झाला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व खड्डे भरण्याची डेडलाइन असताना, चाळण झालेल्या रस्त्याला ठिगळं लावायची तरी किती, असा प्रश्न व्यक्त होत आहे. त्यातच संथगतीने सुरू असलेले खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध संताप व्यक्त करणारे ठरले आहे.
मुसळधार पावसात परतवाडा-अमरावती या मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कालपर्यंत परतीच्या पावसामुळे माती आणि मुरूम टाकून बुजवलेले खड्डे दोन दिवसांपासून गिट्टी आणि डांबराने बुजविण्याचे कार्य सुरू आहे. विशेष म्हणजे, हा विषय ‘लोकमत’ने वारंवार लावून धरला आहे.
काम संथगतीने
परतवाडा ते आसेगावपर्यंतचा मार्ग अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. या मार्गावर खड्डे बुजवण्याचे कार्य संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग म्हणून ओळख असलेल्या परतवाडा-अमरावती या आंतरराज्य मार्गाची पूर्णत: चाळण झाली आहे.
कामात गती हवी
संपूर्ण रस्त्यावरच खड्डे पडल्याने किती ठिकाणी सार्वजनिक बांधकाम ठिगळ लावणार, हा रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना पडलेला गंभीर प्रश्न आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे तीव्र गतीने करण्याची मागणी आता होत आहे.