मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावातील रस्त्याचे बांधकाम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 22:10 IST2018-03-27T22:10:32+5:302018-03-27T22:10:32+5:30
अमरावती जिल्ह्यातील जळका शहापूर ते शिरजगाव मोझरीपर्यंत साडेतीन कोटींच्या डांबरी रस्त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावातील रस्त्याचे बांधकाम निकृष्ट
आॅनलाईन लोकमत
तिवसा : अमरावती जिल्ह्यातील जळका शहापूर ते शिरजगाव मोझरीपर्यंत साडेतीन कोटींच्या डांबरी रस्त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इस्टिमेटप्रमाणे कामे होत नसल्याने हा रस्ता आताच उखडत चालल्याचे दिसून येत आहे. यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली असता, दुर्लक्ष करण्यात येत आहे.
शिरजगाव मोझरी आणि इतरही गावे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतली आहेत. त्यामुळे या परिसरात होत असलेल्या विकासकामांचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, तोच राखला जात नसल्याचे दिसून येत आहे. जळका शहापूर ते शिरजगाव मोझरीपर्यंत सुरूअसलेल्या रस्त्याचा दर्जा आणि गुणवत्ता अत्यंत निकृष्ट आहे. त्यामुळे या संपूर्ण रस्त्याच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक प्रशांत कांबळे यांनी केली आहे. यासंबंधी कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य अभियंता विवेक साळवे, कार्यकारी अभियंता कळमकर यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता दिनकर माहुरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
रस्त्याचे बांधकाम थांबवून संपूर्ण रस्त्याची चौकशी आणि त्याचा दर्जा तपासावा, तसेच रस्त्याच्या निकृष्ट बांधकामप्रकरणी संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, तसेच संबंधित कंत्राटदाराला मोबदला देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. शासनाच्या निधीचा तंतोतंत खर्च करून योग्य दर्जाचे काम व्हावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
रस्त्याचे बांधकाम अंदाजपत्रकाप्रमाणे करावे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इस्टिमेटमध्ये देण्यात आलेल्या निर्देशानुसार जर काम झाले असते, तर रस्ता आतापासून उखडला नसता. धूळमिश्रित डांबरीकरणाचे काम आम्ही सगळे उघड्या डोळ्यांनी बघतो. शिरजगाव मोझरी रस्ता दुरुस्तीच्या नावावर अनेकदा ठेकेदार आणि अधिकाºयांनी पैसे लाटले. हे गाव मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करून त्यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.
ठळक मुद्दे
रस्ता बांधकाम ३ कोटी ५० हजार ६०७ रुपयांचे.
रस्त्याची जाडी ७५ मिमी दिसत नाही.
रस्त्यावरील पाण्यासाठी योग्य उतार दिलेला नाही.
स्प्रेयरसाठी वापरणारा सेटअप संपूर्ण रस्ता बांधकामात कुठेही दिसला नाही.
आयआरसी : एसपी २० प्रमाणे रस्ता बांधलेला जात नाही.
डांबर मारण्याआधी धूळ साफ केलेली नाही.
मुख्यमंत्री दत्तक गावातील रस्त्याची ही दुर्दशा असेल, तर बाकी इतर रस्त्यांचे काय? हा तर गंभीर विषय आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही योजना आणून देखावा केला. या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी. ग्रामीण भागातील रस्ता एकदाच होतो. त्यामुळे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे.
- यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा मतदारसंघ