भूजल उपशावर निर्बंध, बोअरवेल खोदाईवर नियंत्रण
By Admin | Updated: April 24, 2016 00:04 IST2016-04-24T00:04:58+5:302016-04-24T00:04:58+5:30
बेसुमार पाणी उपशामुळे खालावलेला भूजल साठा आणि पाण्याच्या शोधासाठी भूगर्भात खोलवर जाण्याच्या

भूजल उपशावर निर्बंध, बोअरवेल खोदाईवर नियंत्रण
जलपातळी घटली : महाराष्ट्र भूजल अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी
अमरावती : बेसुमार पाणी उपशामुळे खालावलेला भूजल साठा आणि पाण्याच्या शोधासाठी भूगर्भात खोलवर जाण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी २०० फुटापेक्षा खोलवर बोअरवेल खोदण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
राज्यात पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले आहे. या टंचाई स्थितीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याने बोअरवेलच्या खोलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र भूजल (विकास व्यवस्थापन) अधिनियमाची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यात यापुढील काळात दुष्काळी परिस्थिती टाळण्यासाठी बोअरवेल खोदाईवर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे. जमिनीत जेवढे पाणी मुरते, त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक पाणी भूगर्भातून उपसले जावे. राज्याच्या काही भागात भुजलाचे अतिशोषण झाले आहे. भूजलाचा वापर आणि शोषित पाणलोटचे नियमन, त्याचे दुष्परिणाम तसेच लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करण्यासंदर्भातील एक दृष्टीनिबंध भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने तयार केला आहे. त्यामध्ये पाणलोट क्षेत्रात होणारा भूजलाचा अतिरेकी वापर, स्थिरता, विहिरीमधील कमी झालेले पाणी आणि सिंचन क्षेत्रात झालेली घट यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्याची स्थिती
मार्च २०१६ मध्ये अचलपूर, चांदूरबाजार, चांदूररेल्वे आणि अंजनगाव सुर्जी तालुका वगळता अन्य तालुक्यातील भूजल पातळीत सरासरी ०.१८ मिटरने घट दिसून आली आहे. मार्च २०१६ मध्ये भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने भूजल पातळीचे सर्वेक्षण करण्यात आले. यात १४३ विहिरीतील निरीक्षण नोंदविण्यात आले. ड्रायझोनमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रात बोअरवेल करता येत नाही.