आरबीआयच्या निर्देशाला एसबीआयची तिलांजली
By Admin | Updated: May 30, 2015 23:59 IST2015-05-30T23:59:41+5:302015-05-30T23:59:41+5:30
ठेवी, कर्ज व कर्जवसुली यावरच बँका तगत आहे किंबहूना नफ्यात असतात. कर्जासंदर्भात वेळोवेळी भारतीय रिझर्व बँक ...

आरबीआयच्या निर्देशाला एसबीआयची तिलांजली
जाहीर सूचना की गर्भित धमकी : कृषी विकास शाखेमधील सूचना फलक
गजानन मोहोड अमरावती
ठेवी, कर्ज व कर्जवसुली यावरच बँका तगत आहे किंबहूना नफ्यात असतात. कर्जासंदर्भात वेळोवेळी भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) मार्गदर्शक सूचना करतात, हे मानक अव्हेरून स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेत लोन (ऋण) सूचनेविषयी जे फलक लावण्यात आले. यामध्ये आरबीआयच्या मार्गदर्शक सुचनांना तिलांजली देण्यात आली आहे. कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला ह्या ‘सूचना आहेत की धमक्या’ असा प्रश्न पडला आहे.
मे महिना हा खरीप हंगामाचा असतो व स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखा म्हटली तेथे शेतकऱ्यांचा थेट संबंध येतो. कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना तातडीने खरीपासाठी कर्ज द्या याविषयी केंद्र व राज्य शासनाचे बँकांना निर्देश आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कर्ज पुनर्गठन व पीक कर्ज याविषयी बैठक झाली.
सर्व राष्ट्रीयकृत बँकासह स्टेट बँक आॅफ इंडियाचे जिल्हा समन्वयक एस. के. सिंह देखील उपस्थित होते. या बैठकीत कर्ज पुनर्गठन, पीक कर्ज व पीक विमा याविषयीची माहिती सोप्या शब्दात अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
मात्र शहरातील स्टेट बँकेच्या कृषि विकास शाखेत कर्जाविषयी दर्शनी भागात एक सूचना फलक लावला आहे. यामध्ये बँकेद्वारे कर्ज प्राप्त करणे हा कोणत्याही व्यक्तीचा अधिकार नाही. कर्ज देणे हे बँकेच्या विवेकवर अवलंबून असते. बँक आपला कर्ज देण्याचा अधिकार नेहमीच सुरक्षित ठेवते, जेणेकरून आलेल्या कर्जाच्या मागणीला कोणतेही कारण न सांगता नामंजूर करू शकते, अश्या आशयाचा फलक लावला आहे.
या संदर्भात ‘लोकमत’ने स्टेट बँकेच्याच काही माजी अधिकारी व बँकींग व्यवहारासी निगडीत, कर्ज प्रक्रियेमधील सल्लागार यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी कृषि विकास शाखेमध्ये लावण्यात आलेला कर्जाविषयीचा सूचना फलक हा आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांविरोधात असल्याची माहिती दिली. या बँकेत कर्ज मागायला जाणारा शेतकरी व ग्राहकाला ही सूचना न वाटता स्टेट बँकेची धमकी वाटत आहे. शहरातील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कृषि विकास शाखेत कृषि कर्जासाठी शेतकऱ्यांची नेहमीच गर्दी असते. खरीपाचा हंगाम येत्या आठवड्यावर आला आहे. बँकेच्या या सूचना फलकाने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे.
लावण्यात आलेल्या सूचना फलकाविषयी आपण मराठीमधून माहिती जाणून घेतली ती योग्य आहे. इंग्रजीमधीलही माहिती बरोबर आहे. कर्ज नामंजूर केले असल्यास ग्राहकांना सांगण्याची गरज नाही, तरीही या सूचना फलकाविषयी काही दुरूस्ती व सूचना असल्यास ती दुरूस्ती केल्या जाईल.
- अक्षय तिवारी
सहा. प्रबंधक, स्टेट बँक आॅफ इंडिया, अमरावती शाखा.
कर्ज विषयीचा सूचना फलक ही कर्ज मागणाऱ्यांसाठी एक प्रकारची धमकीच आहे. या सुचनामध्ये रिझर्व बँकेच्या वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन आहे. पीक कर्जाचे पाच वर्षासाठी पुनर्गठन करावे, असे आदेश आहेत. प्रत्यक्षात आदेशाची अमंलबजावणीचे पालन नाही.
- बाळासाहेब वैद्य
माजी मुख्य व्यवस्थापक
स्टेट बँक आॅफ इंडिया.
काय आहेत रिझर्व्ह बँकेचे बँकांना निर्देश,
१ जुलै २०१४ रोजीच्या २.५.२ मार्गदर्शक तत्त्वानुसार
(ब) नुसार प्रत्येक कर्ज अर्जाची पोचपावती बँकेनी दिलीच पाहिजे. दोन लाखांपर्यंत कर्ज मागणी असल्यास पोच पावतीमध्येच निर्णय देण्याची अंतिम तारीख लिहीलेली असावी.
(क) नुसार बँकेनी निर्धारीत वेळेतच अर्जाची छाननी करून त्रुटी असल्यास अर्जदारास ताबडतोब कळवाव्यात.
(ड) नुसार काही कारणास्तव कर्ज अर्ज नामंजूर करावयाचा असल्यास अर्जदारास नामंजुरीच्या कारणासहीत बँकेनी लेखी स्वरुपातच व निर्धारीत वेळेतच कळविणे बंधनकारक आहे.