अंजनगाव, दर्यापूरला अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:00 AM2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:53+5:30
गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास परतीच्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दर्यापूर, अंजनगाव व धारणी या तीन तालुक्यांत शुक्रवार दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाने तीन प्रकल्पांची दारे उघडण्यात आली आहेत.अंजनगाव सुर्जी तालुक्यात १८ आॅक्टोबरपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शुक्रवारी सकाळी कहर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी/धारणी/दर्यापूर : तिन्ही तालुक्यांना गुरुवारी रात्री परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला. अंजनगाव सुर्जीतील भंडारज गावात पुराचे पाणी शिरले, तर दर्यापूर तालुक्यातील येवदालगतच्या वडनेरगंगाई गावातून वाहणाऱ्या बोर्डी नदीला मुसळधार पावसाने पृूर आला. अंजनगाव व सुर्जी या दोन गावांच्या मध्यभागातून वाहणाºया शहानूर नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने चक्क हिवाळ्यात शुक्रवारी दुपारी हा मार्ग बंद होता.
गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास परतीच्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दर्यापूर, अंजनगाव व धारणी या तीन तालुक्यांत शुक्रवार दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाने तीन प्रकल्पांची दारे उघडण्यात आली आहेत.अंजनगाव सुर्जी तालुक्यात १८ आॅक्टोबरपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शुक्रवारी सकाळी कहर केला. सतत तीन तास आलेल्या पावसाने तालुक्यातील पाचही मंडळांत प्रचंड पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस भंडारज मंडळात कोसळला. भंडारज, कारला, तुरखेड, जवर्डी, धनवाडीसह पूर्ण मंडळातील कपाशीची हानी झाली.
शुक्रवारी मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानासंदर्भात पंचनामे करण्याच्या तसेच जनावरांची जीवितहानी झाली असेल, तर आर्थिक मदत देण्याच्या सूचना अंजनगावच्या तहसीलदारांना दिल्या आहेत.
- बळवंत वानखडे
आमदार, दर्यापूर
शहानूरची दारे उघडली
शहानूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाचे चारही दरवाजे १० सेंटिमीटरने उघडण्यात आले. शहानूर नदी दुथडी भरून वाहत आहे. अकोट ते अंजनगाव रस्त्यावर सातेगावजवळील निर्माणाधीन पुलाच्या बाजूचा रपटा वाहून गेल्याने सकाळपासूनच हा रस्ता रहदारीसाठी बंद होता.
अकोट-अंजनगाव वाहतूक ठप्प; तीन गाई वाहून गेल्या
वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कारला, सातेगाव, गावंडगाव, निमखेड बाजार, हिरापूर, भंडारज, चिंचोली, वनोजा, हंतोडा, विहिगाव परिसरात शुक्रवारी सकाळी ६ वाजता अचानक झालेल्या अतिवृष्टीने नदी-नाल्यांना पूर आला. पुरात नाल्याकाठच्या घरांतील जीवनावश्यक वस्तू, भांडीकुंडी वाहून गेली. कारला येथील मुरलीधर डोंगरकर यांच्या तीन गाई वाहून गेल्या. कौसल्याबाई रतन इंगळे यांचे पाच पोते सोयाबीन वाहून गेले. सातेगाव फाट्याजवळ पुरामुळे पर्यायी रस्ता वाहून गेल्याने अकोट-अंजनगाव मार्ग दिवसभर बंद होता.
मेळघाटात परतीच्या पावसाने ‘ओला दुष्काळ’
धारणी : तालुक्यात गुरुवारी रात्री व शुक्रवारी दुपारी १२ पर्यंत कोसळलेल्या मुसळधार पावसाने धान पीक पूर्णत: झोपले. येथे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता बुलंद होऊ लागली आहे. महसूल प्रशासनाकडून संयुक्त सर्र्वेेक्षणाचे आदेश देण्यात आले असले तरी तालुक्यातील १५० गावांचे सर्वेक्षण १२ तलाठी, २८ कृषिसेवकांच्या भरवशावर ८ नोव्हेंबरपर्यंत अवघड आहे. यामुळे विनाअट भरपाई देण्याची मागणी शेतकरी बांधवानी केली आहे.