वस्तापूर येथे घरांच्या पंचनाम्याला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:00 IST2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:00:12+5:30
रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह पावसाने लावलेल्या हजेरीमुळे वस्तापूर येथील जवळपास ८३ घरांना झळ पोहोचली. त्यातील काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काहींचे अंशत: नुकसान झाले आहे.

वस्तापूर येथे घरांच्या पंचनाम्याला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : तालुक्यातील वस्तापूर येथे रविवारी दुपारी चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. ज्या भागात क्षती पोहचली येथे पंचनामे सोमवारी सकाळी महसूल व ग्रामपंचायत कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करायला सुरुवात झाली आहे. ५० लाखांपेक्षा अधिक नुकसान असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह पावसाने लावलेल्या हजेरीमुळे वस्तापूर येथील जवळपास ८३ घरांना झळ पोहोचली. त्यातील काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काहींचे अंशत: नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे सोमवारी सकाळपासून तलाठी पी. व्ही. भुयार, ए. एल. देशमुख, एस. वाय. चव्हाण मंडळ अधिकारी कृषी सहायक एन. बी. जामकर, ग्रामसेवक सुधीर भागवत, सरपंच सरस्वती झामरकर, उपसरपंच गजानन येवले, ग्रा. प. सदस्य लक्ष्मण बेलसरे, ग्रा. प.सदस्य पोलीस पाटील शामराव सोमा झामरकर, पोलीस पाटील किसन बारवे, विजय उके आदी कर्मचाऱ्यांद्वारा दिवसभर करण्यात आला. यामध्ये अनेक घरांचे छत उडाले, कवेलू वादळाने फुटले, झाडे उन्मळून पडली. पावसामुळे घरातील धान्य व कपडे, तसेच जीवनावश्यक वस्तू पूर्णत: भिजल्याचे निदर्शनास आले आहे.
महसूल व ग्रामपंचायतींमार्फत पंचनामे करण्यात येत आहे. सदर पंचनामे पंचायत समितीकडे पाठवण्यात येतील. बांधकाम अभियंता नुकसानाच्या रकमेचा आकडा काढतील.
- सुधीर भागवत,
सचिव, ग्रामपंचायत, वस्तापूर
आदिवासी लागले दुरुस्तीला
मान्सूनपूर्व मशागतीची कामे करण्यात मग्न असलेल्या आदिवासीं शेतकºयांसाठी रविवार हा दिवस काळा दिवस म्हणून आला. पेरणीचे नियोजन करीत असताना अचानक आलेल्या या अस्मानी संकटाचा सामना त्यांना करावा लागत आहे. रविवारच्या चक्रीवादळानंतर सोमवारी सकाळपासूनच घरावरील उडालेले छत. फुटलेले कवेलू दुरुस्तीच्या कामात आदिवासी मग्न झाल्याचे दिसून येत आहे.
सरकार मायबाप, जल्दी मदत दे
'इतवार के दिन हमारा पुरा घर का नुकसान हुआ. सरकार मायबाप जल्दी हम गरीब को मदत दे', अशी विनवणी वस्तापूर येथील आदिवासी महिला गंगा नानू जामकर यांनी केली आहे. पंचनामे तर होतच राहतील. पण त्यातून मिळणारा मोबदला लवकर देण्याची मागणी तिने नुकसानग्रस्तांसाठी केली आहे.