शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करून द्यावे यासाठी शासनाने महाबीजचे सोयाबीन बियाणे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियनाअंतर्गत नोंदणी करायला लावली होती. परंतु, बियाणे कमी प्रमाणात असल्याने लकी ड्रा पद्धतीने ३८१ शेतकऱ्यांची नावे अंजनगाव सुर्जी तालुक्यासाठी काढण्यात आली होती. त्याप्रमाणे १४ तारखेपर्यंत शेतकऱ्यांना परवाने वाटप तालुका कृषी कार्यालयामार्फत करण्यात आले. परंतु, जेव्हा शेतकरी बियाणे घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रात गेले तेव्हा बियाणेच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याने महाबीज व कृषी विभागाने शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर गुरुवारी (दि.१७) प्रहार शेतकरी संघटनेतर्फे तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी उपस्थित नसल्याने भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी तालुका अध्यक्ष सनी शेळके यांनी संपर्क साधला व दोन दिवसांत बियाणे उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सनी शेळके, संजय सगणे, उत्तम काळे, दिलीप निर्मळ, विजय पळसकर, प्रकाश राऊत, राजेश ढोक, निखिल कडू, राजेश चिंचोळकर, अनंता मते, छोटू अढाऊ, गोपाल कोल्हेर, योगेश घोगरे, शुभम मानकर, अक्षय काळमेघ, सुजित काठोळे, राम नळकांडे, जीवन कात्रे, शुभम निमकाळे, आदी कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित होते.
दोन दिवसांत बियाणे उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:09 IST