प्रधानमंत्री ग्राम सडक योजना गेली कोमात
By Admin | Updated: May 31, 2015 00:02 IST2015-05-31T00:02:35+5:302015-05-31T00:02:35+5:30
केंद्र शासनाने सन २००१ मध्ये ग्रामीण भागातील खेडे गाव मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक ....

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना गेली कोमात
कामे ठप्प : सात महिन्यांपासून निधीही बंद
अमरावती: केंद्र शासनाने सन २००१ मध्ये ग्रामीण भागातील खेडे गाव मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मोठा गाजावाजा करून अंमलात आली. मात्र नोव्हेबर २०१४ पासून या योजनेस केंद्र शासनाने निधी देण्यास नकार दिल्याने ही योजनाच आता पुर्णत: कोमात गेल्याचे चित्र आहे.
तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात देशात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू झाली. या योजनेच्या पहिल्या टप्यात ५०० लोकसंख्येवरील मुख्य रस्त्याला न जोडलेली गावे जोडणे, त्यापाठोपाठ ५०० ते १००० हजार लोकसंख्या असलेले गाव मजबूत रस्त्याने जोडणे असा कार्यक्रम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत राबविण्यात आला. या उपक्रमाने अनेक अविकसीत असलेली गावे ही मुख्य रस्त्याला जोडण्यात आली.यासाठी केंद्र शासनाने मोठया प्रमाणात निधीही उपलब्ध करून दिला होता. साधारणपणे या उपक्रमामुळे सन २००५ ते २००६ पर्यत राज्यातील खेडी जोडणी पूर्ण झाल्यानंतर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत टप्प्या क्र २ मध्ये रस्ते सुधारणा करण्याची प्रक्रिया या योजनेच्या माध्यमातून राबविली यामध्ये रस्त्याची कामेही समाधनकारक करण्यात आली. सन २०१० मध्ये या योजनेत करण्यात आलेल्या रस्त्यावरील पुलाच्या निमिर्तीचे कामे हाती घेण्यात आले. ही योजना नोव्हेबर २०१४ पर्यत व्यवस्थित सुरू होती. आता केंद्रात भाजपाचे सरकार येताच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला निधी देणेच बंद केला आहे. अशातच अमरावती सह राज्यभरात सुरू असलेल्या योजनेतील कामे अर्धवट स्थितीत अडकून पडली आहेत.परिणामी काम करणारी यंत्रणाही संकटात सापडली आहे.अशातच कंत्राटदारांची सुरक्षा अमानतीचे जिल्ह्यात ८८ लाख रूपये सुध्दा जमा आहेत या योजनेतील केंद्र शासनाने मागील वर्षी नोव्हेबर पर्यत दिलेला शासन निधीही परत घेतल्याची माहिती आहे.
केंद्र शासनाने सदर योजनेसाठी निधी देणे बंद केल्याने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आता गुंडाळली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अशातच केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे ३ हजार कोटीची कामे सुरू केलेली आहेत व या कामासाठी २९८ कोटी रूपये निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे एवढया कमी निधीमध्ये योजनेतील कामे कशी होतील असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.परिणामी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या प्रकारामुळे चांगलीच अडचणीत आली आहे.
(प्रतिनिधी)
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत रस्त्याने न जुडलेली गावे या योजनेच्या माध्यमातून जोडल्या गेलीत शिवाय सध्याही जोडण्याचे काम सुरू आहे. मागील नोव्हेबर महिन्यापासून योजनेस केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून न दिल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या व मंजुर कामांना शासनाने निधी द्यावा
-गिरीश कराळे
सभापती बांधकाम समिती जि.प