बियाण्यांच्या होम डिलिव्हरीत फसवणुकीची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:01 IST2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:01:23+5:30
यंदाच्या खरिपामध्ये जिल्ह्यात ७.२८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित केली आहे. त्यापैकी २.६१ हेक्टर क्षेत्रावर कापूस पेरणी प्रस्तावित आहे. शासनमान्य नसलेल्या इतर कोणत्याही प्रकारच्या कापूस बियाण्यांची खरेदी कोणत्याही अनधिकृत विक्रेत्याकडून करू नये, असे चवाळे यांनी सांगितले. बियाणे खरेदी करताना न चुकता पक्के बिल घ्यावे.

बियाण्यांच्या होम डिलिव्हरीत फसवणुकीची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या बीजी-१ व बीजी-२ या वाणाचीच लागवड करावी. काही अनधिकृत विक्रते शासनमान्यता नसलेल्या एचटीबीटी किंवा तत्सम कोणत्याही प्रकारच्या बियाण्यांची अवैध घरपोच सेवा देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करतात. त्याला बळी पडू नये. कपाशीचे बियाणे खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले.
यंदाच्या खरिपामध्ये जिल्ह्यात ७.२८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित केली आहे. त्यापैकी २.६१ हेक्टर क्षेत्रावर कापूस पेरणी प्रस्तावित आहे. शासनमान्य नसलेल्या इतर कोणत्याही प्रकारच्या कापूस बियाण्यांची खरेदी कोणत्याही अनधिकृत विक्रेत्याकडून करू नये, असे चवाळे यांनी सांगितले. बियाणे खरेदी करताना न चुकता पक्के बिल घ्यावे. बिलात पीक, वाण लॉट क्रमांक, वजन, अंतिम मुदत, कंपनीचे पूर्ण नाव नमूद आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. कृषिसेवा केंद्र संचालकाने पक्के बिल न दिल्यास तात्काळ कृषी कार्यालयात संपर्क करावा. बियाणे पाकिटावरील सरकारमान्य चिन्ह तपासून घ्यावे. बोलगार्ड-२ मध्ये उपलब्ध असलेल्या बीजी-२ या वाणाच्या पाकिटाची एमआरपी किंमत ७३० रुपये आहे.
बियाणे पाकीट सीलबंद अथवा मोहोरबंद असल्याची खात्री करूनच खरेदी करावी. पाकिटावरील अंतिम मुदतीची तारीख तपासावी. बीजी-२ तंत्रज्ञान सर्व वाणांमध्ये सारखेच असते. त्यामुळे एका विशिष्ट वाणाची मागणी टाळावी. कापूस पिकाची लागवड जून महिन्यात १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय करू नये. पूर्वहंगामी कापूस लागवड पूर्णत: टाळावी, असेही त्यांनी सांगितले. शेतकºयांंना बोगस व बेकायदेशीर बियाणे लागवड अथवा विक्री आढळल्यास कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयास कळवावे, नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे चवाळे यांनी सांगितले.
पाच वर्ष कैद एक लाखांचा दंड
शासनमान्य नसलेल्या एचटीबीटी किंवा तत्सम बियाणांच्या वापराने शेतकºयांची फसवणूक तर होतेच, शिवाय हे बियाणे पर्यावरणासाठी नुकसानकारक असल्याने त्याची विक्री कायद्यानुसार गुन्हा ठरविण्यात आली आहे. त्यासाठी पाच वर्षे कैद व एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे. बेकायदेशीर बियाणे विक्री करणाºया व्यक्तीवर बियाणे नियंत्रण आदेश १९८३, महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम २००९ व नियम २०१०, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ या कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा चवाळे यांनी दिला.
यंदा बीजी-३ ला परवानगी नाही
प्रचलित वाणांचा वापर करून तणनाशक (राऊंडअप बीटी), चोर बीटी, विडगार्ड, एचबीटी यांसारखी शासनमान्यता नसलेल्या बियाण्यांची विक्री करून शेतकºयांना घरपोच सेवा देण्यात येते. शासनाने बीजी-१ व बीजी-२ याव्यतिरिक्त कोणत्याही जनुकीय तंत्रज्ञानाला (बीजी-३) ला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कापूस बियाण्याची खरेदी अधिकृत बियाणे परवानाधारक यांच्याकडूनच करावी व फसगत टाळावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.