अपयशाचा मार्ग जातोय मृत्यूच्या दारात
By Admin | Updated: February 1, 2015 22:47 IST2015-02-01T22:47:05+5:302015-02-01T22:47:05+5:30
आजच्या स्पर्धात्मक युगात पैसा टाका अन् झटपट यश मिळवा, अशी मानसिकता मुला-मुलींची व पालकांची झाली आहे. यामध्ये अपयश आल्यास पावले आत्महत्त्येकडे वळतात.

अपयशाचा मार्ग जातोय मृत्यूच्या दारात
वर्षभऱ्यात ३७ आत्महत्या : मनाविरुद्ध होणाऱ्या घटनांचा शेवट
अमरावती : आजच्या स्पर्धात्मक युगात पैसा टाका अन् झटपट यश मिळवा, अशी मानसिकता मुला-मुलींची व पालकांची झाली आहे. यामध्ये अपयश आल्यास पावले आत्महत्त्येकडे वळतात. अशा आत्महत्येचे प्रमाण अलीकडेच वाढले आहे. जिल्ह्यात वर्षभरात ४७ आत्महत्या झाल्यात, असे प्रकार सामाजिकदृष्ट्या चिंताजनक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.
आत्महत्यांमध्ये युवा वर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. नैराश्यातून आत्महत्या झालेल्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या युवापिढीच्या आहेत. नवविवाहिता, शाळकरी मुले, तरुण शेतकरी, उच्चशिक्षित नोकरवर्गही याला अपवाद नाही. आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे.
आजकाल प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियामुळे कॉलेज तरुणींमध्ये विचारांचे आदानप्रदान व एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झालेले आहे. पुस्तकापेक्षा मोबाईलवर चॅटींग करण्यात अधिकाधिक वेळ खर्ची घालणारा हा वर्ग यामध्ये धन्यता मानतात. यामधून मैत्री, प्रेम फुलत जाते आणि नको इतक्या प्रमाणात ते स्वत:ला वाहून घेतात. त्यातून एकतर्फी प्रेमाचा किंवा घरच्यांचा विरोध अशा गोष्टींमुळे तरुण तरुणींना नैराश्य येते आणि पावले आत्महत्येकडे वळतात. उच्चशिक्षित युवकांमध्येही आत्महत्येचे वाढते प्रमाण आहे. काही युवक स्वाभिमान दुखावल्याच्या नैराश्येतून आत्महत्या करतात, काही व्यक्ती व्यवसायात, नोकरीत थोड्याशा आलेल्या अपयशानेही जीवन संपवितात. सध्याच्या युगात प्रत्येक गोष्ट हायटेक बनली आहे. चैनीच्या वस्तू वापरामुळे जीवनही गतिमान झाले आहे. नवविवाहितांच्या आत्महत्यांमागे सासरचा जाच, चारित्र्यावर संशय, प्रॉपर्टी आणि पैशाची मागणी त्याचसोबत शिक्षणामुळे वाढत्या अपेक्षा, नैराश्य व अपमानास्पद जाचाला कंटाळून अखेर आत्महत्येचा पर्याय निवडतात.