पालेभाज्याही झाल्या रासायनिक

By Admin | Updated: May 31, 2015 00:09 IST2015-05-31T00:09:07+5:302015-05-31T00:09:07+5:30

आधुनिक काळात नवीन तंत्र वापरून शेतात भरघोस उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्पादन वाढीसाठी रासायनिक

Palebazine also becomes chemical | पालेभाज्याही झाल्या रासायनिक

पालेभाज्याही झाल्या रासायनिक

नागरिकांच्या आरोग्याला धोका : जमिनीतील पोषक तत्त्वे बेपत्ता
सुमित हरकुट चांदूरबाजार
आधुनिक काळात नवीन तंत्र वापरून शेतात भरघोस उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीतील मुख्य पोषक तत्त्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
किमान २० वर्षांपूर्वी शेतकरी शेती व्यवसायाबरोबर गाय, म्हैस, बैल, शेळ्या आदी पाळीव जनावरे पाळत होते. शेतीपुरक व्यवसाय म्हणूनही त्याचा वापर होता. या पाळीव जनावराची विष्ठा शेतीसाठी शेणखत म्हणून उपयोगी येत होती. या जनावराची विष्ठाच खताचे काम करीत होती. शेणखत जमिनीसाठी अत्यंत पोषक ठरत होते. त्यामुळे शेतजमिनीतील पोषक तत्वांना बळ मिळत होते. जमिनीतील पोषक तत्वांना शेणखतापासून कोणतीच हानी पोहोचत नव्हती. सोबतच पूर्णपणे निरोगी पिकापासून शेतकऱ्याला भाजीपाला व इतरही पिके घेता येत होती. परिणामी उत्पादनाचा दर्जाही अत्यंत चांगला राहत होता. पीक कसदार निपजत होते.
शेणखतामुळे शेतीत उत्पन्नही भरपूर होत होते. विशेष म्हणजे ते सर्व कसदार राहात होते. पूर्वी शेतकरी खडीचा हिशेब लावून खंडीने उत्पन्न झाले, अशी चर्चा करीत होते. वयोवृद्ध शेतकरी गावातील पारावर बसून उत्पादनाबाबत चर्चा करीत होते. खरीप आणि रबी पिकावर कोणत्याही रोगांनी आक्रमण केले की शेतकरी आपसात चर्चा करून त्यावर उपाययोजना करीत होते. मात्र कालांतराने ही पद्धतच मोडीत निघाली. आता कोणत्याही गावात हे चित्र दिसून येत नाही. पीक चांगले राहण्याकरिता आता शेतकरी रासायनिक खताचा भरमसाठ वापर करतात. त्यामुळे शेतजमिनीचा पोतच खालावत आहे. सोबतच जमिनीतील अत्यंत सुपिक आणि पोषक तत्वे नष्ट होत आहे.
आता शेतकरी रासायनिक खताचा वापर जादा प्रमाणात करतात त्यामुळे सुपित शेतजमीन आता बंजर होण्याची शक्यता बळावली आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतासोबत दिवसेंदिवस महागड्या किटकनाशकाचाही अत्याधिक वापर होऊ लागला आहे.
कीटकनाशक आणि रासायनिक खताच्या वापरामुळे आता भाजीपालाही रासायनिक झाला आहे. शेतकरी, मजुरासह सर्वच रासायनिक भाजीपाला खात आहे. सेंद्रीय भाजीपाला मिळणे दुरापास्त झाले आहे. केवळ शेणखताच्या जमिनीतील भाजीपाला मिळणे तर अत्यंत दूर राहिले आहे. काही कीटकनाशकामधील विषारी घटकद्रव्य भाजीपाल्यास मिसळत असल्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळते.
या सोबतच आता कचरा नष्ट करणारी औषधे आली. गवतावर फवारणी करण्यासाठीही औषधे आली, जंगली जनावरांच्या हैदोसामुळे त्रस्त शेतकरीही जनावरे शेतात शिरू नये म्हणून औषधीची फवारणी करतात. हे औषधी धुऱ्याने फवारल्यास कोणतेही जनावर सुगंधाने शेतात शिरत नाही. मात्र या औषधामुळे पीक रासायनिक होत आहे.

रासायनिक खते न दिल्यास उत्पादनात घट
सध्या पिकांना रासायनिक खताची मात्रा न दिल्यास उत्पन्नात घट होत असल्याचे दिसून येते. परिणामी शेतकरी त्याचा अतिवापर करतात. अधिक उत्पन्नासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. सिंचन सुविधा तोकडी असल्याने त्यांना कोरडवाहू जमिनीतून जादा उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. पूर्वी शेतकरी कोरडवाहू शेतात वांगोडे तयार करून त्यात भाजीपाल्याची लागवड करायचे. त्यावर त्यांचा घरगुती खर्च भागत असे. मात्र, सध्या कोरडवाहू शेतातून हे वांगोडे नष्ट झाले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेतात भाजीपाला लावणेच बंद केले आहे. या भागात सिंचनाच्या पाहिजे तशा सोयी नाहीत.

Web Title: Palebazine also becomes chemical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.