जात पडताळणी विभागाचा अफलातून कारभार
By Admin | Updated: June 9, 2014 23:21 IST2014-06-09T23:21:49+5:302014-06-09T23:21:49+5:30
समाजकल्याण विभागाच्या अधिनस्थ असलेल्या येथील जात पडताळणी विभागाच्या अफलातून कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहे. जात पडताळणीच्या अटी पूर्ण झाल्यानंतरही प्रमाणपत्रासाठी हेलपाटे घ्यावे

जात पडताळणी विभागाचा अफलातून कारभार
अमरावती : समाजकल्याण विभागाच्या अधिनस्थ असलेल्या येथील जात पडताळणी विभागाच्या अफलातून कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहे. जात पडताळणीच्या अटी पूर्ण झाल्यानंतरही प्रमाणपत्रासाठी हेलपाटे घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे. जात पडताळणी समितीची बैठक झाली नसल्याचे एवढेच टिपिकल उत्तर देत केवळ तारीख पे तारीख असा कारभार सुरू आहे.
येथील जात पडताळणी विभागाचे कामकाज अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम या जिल्ह्यांसाठी चालविले जाते. जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज दिल्यानंतर निर्धारित वेळेत संबंधित अर्जदाराला प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे. मात्र सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतरही जात प्रमाणपत्र दिले जात नाही. या कार्यालयाच्या पायर्या झिजवून नागरिक त्रस्त झाल्याचे चित्र आहे. मात्र चिरीमिरी देऊन जात प्रमाणपत्र सहजतेने मिळविता येते, असा या विभागाचा कारभार सुरू आहे. दर दिवसाला हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक जात पडताळणी प्रमात्रासाठी या कार्यालयात येतात. या कार्यालयात नागरिकांचे काहीही म्हणणे ऐकून घेतले जात नाही. कळविले जाईल, समितीची बैठक व्हायची आहे, मेसेज पाठवू, अशा ठरावीक भाषेत उत्तर देत जनतेला छळ केला जात आहे. तयार झालेले जात पडताळणी प्रमाणपत्र वाटप करण्यास विलंब का लावला जात आहे, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. जात पडताळणीकरिता अर्ज दाखल केल्यानंतर त्याची पोच दिली जाते. मात्र अनेक अर्जदारांकडे पोच असताना फायली गहाळ झाल्याचाही प्रकार येथे घडत आहे. जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्राप्त अर्जांची छाननी करून ती समितीपुढे सादर केली जाते. ज्या अर्जदारांचे कागदपत्र पूर्ण असल्यास त्यांची छाननी करून अशा अर्जदारांना भ्रमणध्वनीद्वारे संदेश पाठविला जातो. अनेक अर्जदारांना संदेश मिळाला. मात्र ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप प्रमाणपत्र मिळाले नाही. प्रमाणपत्र वाटप न करण्यामागील काय गौडबंगाल आहे हे अर्जदारांना कळेनासे झाले आहे. जात पडताळणी विभागाच्या अफलातून कारभाराविषयी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.