पश्चिम विदर्भातील ५०९ सिंचन प्रकल्पांत ३५ टक्केच पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 19:44 IST2020-05-23T19:44:19+5:302020-05-23T19:44:45+5:30
पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०९ सिंचन प्रकल्पांत २१ मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार ३४.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पश्चिम विदर्भातील ५०९ सिंचन प्रकल्पांत ३५ टक्केच पाणीसाठा
संदीप मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०९ सिंचन प्रकल्पांत २१ मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार ३४.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
एकूण नऊ मोठ्या प्रकल्पांत ४२.०२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे, तर २४ मध्यम प्रकल्पांत ४०.५८ टक्के पाणीसाठा सद्यस्थितीत शिल्लक आहे. ४७६ लघु प्रकल्पांमध्ये २२.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ५०९ प्रकल्पांची एकूण सरासरी टक्केवारी ३४.७४ टक्के आहे. ५०९ प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२२०.५५ दशलक्ष घनमीटर असून, आजचा उपयुक्त पाणीसाठा १११८.८९ दशलक्षघनमीटर एवढा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा चांगला असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह रबी सिंचनाकरिता पाण्याची मुबलक सोय झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी साठा जरी पाचही जिल्ह्यात मुबलक असला तरी उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठ्या झपाट्याने घट होत आहे. त्याअनुषंगाने पाणी जपून वापरणे गरजेचे असल्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.
नऊ मोठ्या प्रकल्पांत ४२.०२ टक्के पाणी
अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५२.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस या मोठ्या प्रकल्पात ३२.२४ टक्के, अरुणावती १०.९२ टक्के, बेंबळा ५४.९०, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ४३.२९, वाण प्रकल्प ४६.४२, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा ५०.८५, पेनटाकळी ४४.८७, खडकपूर्णा १९.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.