आता कैद्यांनाही मांडता येणार मनातील व्यथा !

By Admin | Updated: September 2, 2016 00:11 IST2016-09-02T00:11:21+5:302016-09-02T00:11:21+5:30

उत्तुंग चार भिंतींच्या आत सूर्योदय ते सूर्यास्त अशी दिनचर्या असलेल्या कैद्यांना आता आपल्या व्यथा मांडता येणार आहेत.

Now the prisoners can come up with sadness! | आता कैद्यांनाही मांडता येणार मनातील व्यथा !

आता कैद्यांनाही मांडता येणार मनातील व्यथा !

पाच समस्यांवर मंथन : अमरावती कारागृहात बंदीसुधार अभियान प्रारंभ
अमरावती : उत्तुंग चार भिंतींच्या आत सूर्योदय ते सूर्यास्त अशी दिनचर्या असलेल्या कैद्यांना आता आपल्या व्यथा मांडता येणार आहेत. याच पार्श्वभूमिवर अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंदीसुधार अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. सोमवारी कैद्यांनी मांडलेल्या व्यथांनी कारागृहाच्या भिंती देखील द्रवल्या.
अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक भाईदास ढोले यांनी बंदीसुधारणा व पुनर्वसनांतर्गत विविध सामाजिक संघटना, महिला व बालकल्याण विभागाच्या सहकार्याने कैद्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पाषाण भिंतींच्या आत हातून कळत, नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित शिक्षेच्या रुपात भोगत असलेल्या कैद्यांना त्यांच्या व्यथा, वेदना मांडण्याची संधी बंदीसुधार अभियानातून मिळाली आहे. खरे तर कारागृहातील दिनचर्या ठरलेलीच. परंतु सामाजिक जाण असलेले अधिकारी असले की, वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या समस्या, प्रश्न क्षणात मार्गी लावता येतात. याची प्रचिती कारागृह अधीक्षक ढोले यांनी बंदीसुधार अभियानामुळे आली. सोमवारी पार पडलेल्या कार्यशाळेत कैद्यांना जेल प्रशासनाने पाच विषयांवर बोलते केले. यात बंदीसमस्या, कारागृह स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती अभियान, मानसिक रुग्ण असलेल्या कैद्यांचे सर्वोच्च व उच्च न्यायालयात अपील तसेच वैद्यकीय उपचार या विषयांचा समावेश होता.
अभियानात सुमारे ६०० कैद्यांनी सहभाग घेतला. पहिल्यांदाच कैद्यांना त्यांच्या मनात दडलेल्या भावना मांडण्याची संधी मिळाल्याने अनेक कैदी गहिवरून गेले होते.
एरवी जेलर दंडुक्याचा धाक दाखवित कारागृहात नियमांचे धडे देत असतात. कैद्यांना त्याची सवय झाली असते. या चाकोरीबद्ध जीवनात अचानक कैद्यांना त्यांच्या समस्या, प्रश्न मांडण्याची संधी दिल्याने कैद्यांना आश्चर्य तर वाटलेच पण सुखद धक्काही बसला. कारागृहातील खुल्या पटांगणात एकत्र येऊन ‘मनातील व्यथा नि:संकोचपणे मांडा’, असे कारागृह अधीक्षक ढोले यांनी सांगताच अनेकांना गहिवरून आले. हळूहळू कैद्यांच्या मनातील भीती दूर झाली.
बहुतांश कैद्यांनी नातेवाईकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मनोरुग्ण कैद्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याबाबतची व्यथा मांडली.
कारागृहात मनोरुग्ण कैद्यांना वेगळ्या बराकीत ठेवले जाते. मात्र, कारागृह अधीक्षकांनी मनोरुग्ण कैद्यांच्याही समस्या ऐकून घेतल्यात. मनोरूग्ण कैदी देखील माणसेच आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी कारागृह प्रशासन सदैव तत्पर राहिल, असे अभिवचन त्यांनी कैद्यांना दिले.
कैद्यांचे प्रश्न, समस्या खुल्या मनाने कारागृह प्रशासन ऐकत असल्याने अनेक बंदीजनांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद झळकला. दरम्यान चार कैद्यांनी व्यसनमुक्तीचा निर्धार केला. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर समाजात परत जाताना गुन्हेगार आणि व्यसनाचा कलंक पुसून टाकण्याची शपथ चार बंद्यांनी घेतली.
या अभिनव कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक भाईदास ढोले, महिला व बालकल्याण अधिकारी चवरे, वऱ्हाड संस्थेचे नागदिवे, प्रमोद मेश्राम, अवेअरनेस संस्थेचे अमित शहाळकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक जाधव, मंडळ तुरूंगाधिकारी सदांशिव, मोडकर, सुभेदार तिवस्कर, पांडे, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी भूषण कांबळे, अंमलदार दाबेराव, वैद्यकीय अधिकारी गणोरकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Now the prisoners can come up with sadness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.