भाषण नको, अॅक्शन हवी
By Admin | Updated: June 23, 2016 00:02 IST2016-06-23T00:02:00+5:302016-06-23T00:02:00+5:30
शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यांना तत्काळ पीक कर्ज मिळायला पाहिजे. यातील तीन बैठकी घेतल्या आता वाटपाच्या टक्केवारीचे कागदी घोडे नाचवू नका,...

भाषण नको, अॅक्शन हवी
पालकमंत्री : जून अखेरपर्यंत १०० टक्के पीक कर्ज वाटपाचे निर्देश
अमरावती : शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यांना तत्काळ पीक कर्ज मिळायला पाहिजे. यातील तीन बैठकी घेतल्या आता वाटपाच्या टक्केवारीचे कागदी घोडे नाचवू नका, बैठकीत नेहमीचे तुमचे भाषण नको, आता फक्त अॅक्शन पाहिजे दिलेले कर्जवाटपाचे ‘टार्गेट’ मुदतीच्या आत पूर्ण झाले पाहिजे, अशी तंबी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बुधवारी बचत भवन येथे आयोजित पीक कर्ज वाटपाच्या आढावा बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिली.
सर्वच बैठकांविषयी शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांची विनाकारण अडवणूक केली जाते. त्यांना उद्धटपणाची वागणूक दिली जाते. वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्याकडून रक्कम उकळल्या जाते, हे सर्व प्रकार खपवून घेतल्या जाणार नाही.
शेतकऱ्यांना तात्काळ कर्जवाटप करण्याचे राज्याच्या मुख्यमंत्र्याचे आदेश आहेत. या आदेशाची अंमलबजावणी झालीच पाहीजे, ज्या बँका मुदतीच्या आत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करु शकणार नाही. त्यांनी आपल्या या बैठकीत स्पष्टपणे सांगावे त्यांचा तसा अहवाल मुख्यमंत्र्यांना देऊ मात्र, शेतकरी बँॅकात येत नाही अश्या खोटया सबबी आता सांगू नका, आपण सर्व शेतकऱ्यांची मुले आहात शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम झाले पाहिजे. शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप व पुनर्गठन ३० जूनच्या आत झाले पाहिजे, असे पालकमंत्र्यानी निक्षून सांगितले.
यंदाच्या खरीपासाठी १७५९ कोटी रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. यापैकी ९४० कोटी रुपयांचे कर्जवाटप सद्य:स्थितीत झाले आहे. पीक कर्ज वाटपाची ही ५३ टक्केवारी आहेत. यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३१७ कोटी, राष्ट्रीयकृत बँकांनी ६२३ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. अजून २ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना पीक अजून ८१९ कोटी कर्जवाटप करायचे आहे. पुनर्र्गठनासाठी जिल्ह्यात ७१ हजार २२९ शेतकरी पात्र आहेत. त्यापैकी ४३ हजार ७२९ शेतकऱ्यांचे पुनर्गठन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी दिली. जिल्हा उपनिंबधक गौतम वालदे, सुनील रामटेके आदी उपस्थित होते.
कर्जातून कुठल्याही शुल्काची कपात नको
स्टेट बँक व बँक आॅफ महाराष्ट्र या बँका शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून प्रक्रिया शुल्क वसूल करुन कर्जात विम्याची रक्कम चढवित आहेत. शासनाने प्रक्रिया शुल्क रद्द केले आहे. शासनाचा कृषी पीक विमा असताना तूम्ही तुमचा पीक विमा शेतकऱ्यांवर लावू नका, असे पालकमंत्री म्हणाले.
ही धमकी समजायची असले तर समजा
देना बॅकेच्या व्यवस्थापकाविषयी अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. मुख्यमंत्र्यांना आधी काही समजत नाही, असे उर्मट बोलल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या बँकेनी केवळ ११ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. शुक्रवारच्या आत १५ कोटीचे कर्जवाटप झालेच पाहीजे. याला तुम्ही धमकी समजा असेल तर समजा? असे पालकमंत्र्याची दरडाऊन सांगितले.
शेतकऱ्यांच्या तक्रारीचा वाचला पाढा
जिल्हा बँकेसह सेट्रल बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, देना बँक, आदी बँक संदर्भात शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारीचा पाढा पालकमंत्र्यानी वाचून दाखविला, शेतकऱ्यांना बँकेतून हाकलून दिल्याच्या तक्रारीमुळे पालकमंत्री संतापले.