नेरपिंगळाईत १०४८ वर्षे पुरातन गणपती
By Admin | Updated: September 25, 2015 23:59 IST2015-09-25T23:59:34+5:302015-09-25T23:59:34+5:30
येथील गुरु गंगाधार स्वामी वीरशैव मठात शके ८८५ इ.स. ९६३ पासून गणेशोत्सव साजरा केला जातो.

नेरपिंगळाईत १०४८ वर्षे पुरातन गणपती
भाविकांची गर्दी : गंगाधर स्वामी मठाची परंपरा, दगडधोंड्यातून भाविक घेतात लोटांगण
श्रीकृष्ण मालपे नेरपिंगळाई
येथील गुरु गंगाधार स्वामी वीरशैव मठात शके ८८५ इ.स. ९६३ पासून गणेशोत्सव साजरा केला जातो. काही भाविक विसर्जनस्थळापासून मठापर्यंत म्हणजे दीड कि.मी. अंतर दगडधोंड्यातून लोटांगण घालीत कापतात. ही एक दैवी अनुभूती मानली जाते.
नेरपिंगळाई येथील श्रीगुरु गंगाधर स्वामी मठाची स्थापनेची नोंद मठाच्या प्रवेशद्वारावर आजही अंकित आहे. १२व्या शतकातील कल्याणमधील क्रांतीनंतर सर्व शरण देशाच्या अन्य भागात विखुरले गेले. शरणाई आपले बाल बस्त यास घेऊन येथे राहत असताना बाल बस्त अचानक बेपत्ता झाला. शरणाई चिंतीत झाल्या. तो परत यावा म्हणून त्यांनी गणेशाची आराधना व नवस बोलला आणि चमत्कार म्हणजे बाल बस्त धावत येऊन शरणाईला बिलगले. तो दिवस होता भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा आपल्याला जणू गणेश मिळाला, या आनंदात त्यांनी येथे गणेशाची स्थापना केली. तेव्हापासून येथे गणेशोत्सव साजरा केला जातो. ज्या ठिकाणी शरणाईने श्री गणेशाची स्थापना केली होती त्याच जागेवर आजही ही विधिवत माती ठेवण्यात येते व या मातीवर धार्मिक काशीखंड या ग्रंथाचे संस्कार केले जाते. त्यानंतर ही मुर्ती अमरावतीचे मुर्तिकार आजने यांच्याकडे पोहोचवून मूर्ती घडविण्यात येते. ही मुर्ती सहा ते सात फूट उंचीची व स्वरुप परंपरागत असते.
१०४८ वर्षाची पंरपरा येथील मठाच्या गणेशोत्सवाला लाभली आहे. मठाव्यतिरिक्त गावात पन्नासच्यावर सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. गावाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी मठाचा गणपती असतो. त्यामागे इतर मंडळ व घरगुती गणेशमुर्ती राहतात. विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी मुस्लीम भागात मुस्लीम बांधव पिण्याच्या पाण्याची सोय करतात. मिरवणुकीत द्यिंा, ढोल-ताशे, भजनी मंडळी व सार्वजनिक देखावे सहभागी असतात. विसर्जनानंतर काही भाविकस श्रीगुरु गंगाधर स्वामींच्या नावाने लोटांगण घालतात. विसर्जन स्थळापासुन ते मठापर्यंत दगड-धोंड्यातून हे लोटांगण घातले जाते. भाविकांना मठातील विहिरीच्या पाण्याने, आंधोळ घातली जाते व मठाधिपती त्यांना प्रसाद देतात. या लोटांगण दरम्यान कोणतीही इजा होत नाही. असे भाविक मानतात.