सावलीवर मात करणारे सौर ऊर्जा मॉड्यूलचे नवे संशोधन पेटंट
By गणेश वासनिक | Updated: August 4, 2025 13:24 IST2025-08-04T13:24:27+5:302025-08-04T13:24:57+5:30
Amravati : डॉ. विजय इंगोले यांच्या नवीन संशोधनाला पेटंट, सौर मॉड्यूल कार्यक्षमतेचे ऑप्टिमायझिंग करण्यासाठी अँटी-शेडिंग डिव्हाइस

New research patent for solar power module that overcomes shadow
अमरावती : सौर ऊर्जा आज जगाच्या ऊर्जा क्रांतीचे केंद्रबिंदू मानल्या जाते. पण त्यावर पडणारी सावली हा त्यातील सर्वांत मोठा शत्रू आहे. झाडाची फांदी, इमारतीची सावली किंवा तारेची रेषा सावली जरी सोलर पॅनलवर पडली तरी वीज निर्मिती जवळपास थांबते आणि सौर यंत्रणेला आगीची संभावना असते. मात्र अमरावतीचे डॉ. विजय इंगोले यांच्या ‘सौर मॉड्यूल कार्यक्षमतेचे ऑप्टिमायझिंग करण्यासाठी अँटी-शेडिंग डिव्हाइस’ यांच्या नव्या संशोधनामुळे या समस्या कायमच्या मिटल्या असून त्याची अंतर्गत रचना बदलणारी सावली प्रतिबंधक सौर पद्धत आता या नवीन पेटंटद्वारे अधिकृत झाली आहे.
सौर पॅनलवर पडणाऱ्या सावलीमुळे होणारी वीज निर्मितीतील घट रोखण्यासाठी विकसित केलेल्या या अभिनव तंत्रज्ञानाचे पेटंट राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे. डॉ. इंगोले यांनी आतापर्यंत ३९ पेटंट दाखल केली आहेत. सौर तंत्रज्ञान, विद्युत उपकरणे, यांत्रिक इंजिन डिझाइन या क्षेत्रात त्यांनी अनेक मौलिक संकल्पना विकसित केल्या आहेत. ग्रीन सर्कल या त्यांच्या अनुसंधान केंद्रात त्यांचे संशोधनाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. जगभरात कार्बन फुटप्रिंट कभी करण्यासाठी नवीकरणीय ऊर्जेकडे जलद गतीने वळण सुरू आहे. भारताने २०३० पर्यंत १०० जीडब्ल्यू नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य ठरवले असून डॉ. इंगोले यांचे हे पेटंट त्या मिशनशी सुसंगत असून, हरित ऊर्जेचा प्रसार वेगाने करण्यात मदत ठरेल. विशेष म्हणजे भारताकडे थार वाळवंटासारखी प्रचंड सौर क्षमता आहे. याशिवाय आपने पंतप्रधान यांनी मांडलेली ''''वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड’ (सूर्य कधी न मावळणारे जाळे) ही संकल्पना प्रत्यक्षात येईल. ज्यात जगभरातील सौर ऊर्जेचे जाळे परस्पर ओढले जाईल. आणि उर्जा साठवण बॅटऱ्यांची गरजही कमी होईल.
भारत जागतिक पातळीवर ऊर्जेचा पुरवठादारही बनू शकेल
सौर ऊर्जा सेवेसाठी अधिक विश्वासार्ह, सुरक्षित आणि परवडणारी करणे हा आहे. देशात नवीकरणीय ऊर्जेचा खरा क्रांतिकारी वापर होईल हा नवीन संशोधनाचा उद्देश असल्याचे डॉ. इंगोले यांनी सांगितले. भविष्यात अशा तंत्रज्ञानाच्या आधारे भारत फक्त ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होणार नाही तर जागतिक पातळीवर ऊर्जेचा पुरवठादारही बनू शकेल, असेही संशोधक डॉ. विजय इंगोले यांनी सांगितले.