शंकर महाराजांना अटक करुन नार्को टेस्ट करा
By Admin | Updated: September 2, 2016 00:07 IST2016-09-02T00:07:39+5:302016-09-02T00:07:39+5:30
ंिपंपळखुटा येथील शंकर महाराज संस्थानच्या आश्रमात प्रथमेश सगणे या चिमुकल्याचा गळा चिरुन नरबळी देण्याचा प्रयत्न झाला आहे.

शंकर महाराजांना अटक करुन नार्को टेस्ट करा
दादासाहेब क्षीरसागर यांची मागणी : मातंग समाजाचा शनिवारी महामोर्चा
अमरावती : ंिपंपळखुटा येथील शंकर महाराज संस्थानच्या आश्रमात प्रथमेश सगणे या चिमुकल्याचा गळा चिरुन नरबळी देण्याचा प्रयत्न झाला आहे. तरीही पोलीस मुख्य आरोपी शंकर महाराजांना अटक करीत नाहीत, पोलिसांची भूमिका संशयास्पद असून हे प्रकरण सीआयडीकडे सोपवावे. तसेच शंकर महाराजांना अटक करुन त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते दादासाहेब क्षीरसागर यांनी गुरुवारी पत्रपरिषदेतून केली आहे.
शंकर महाराजांना अटक करुन प्रथमेश सगणे व अजय वनवेला न्याय मिळवून देण्यासाठी शनिवार ३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाद्वारे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमिवर आयोजित पत्रपरिषदेतून दादासाहेब क्षीरसागर यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. प्रथमेश सगणे याचा गळा चिरुन नरबळी देण्याचा प्रकार झाला असताना मुख्य आरोपींना का अटक करण्यात आली नाही? याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असता तुम्हीच सांगा याप्रकरणी काय करावे? असा सवाल त्यांनी केला. हे अत्यंत दुर्देवी आहे, असे शल्य त्यांनी व्यक्त केले. अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी मोर्चे, आंदोलने करून शंकर महाराजांना अटक करण्याची मागणी केली आहे. तथापि पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला. पिंपळखुटा येथे ‘मानवत नरबळी’प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याचा दाट संशय त्यांनी व्यक्त केला. प्रथमेशवरील नरबळीच्या उद्देशाने झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस आरोपींना अभय देत असून हे प्रकरण सीआयडीकडे सोपविल्यास विविध वास्तव पुढे येतील, असा दावा त्यांनी केला.
३ सप्टेंबर रोजी महामोर्चा
अमरावती : किंबहुना पोलीस अधीक्षकांनी प्रथमेश नरबळी प्रकरणी नेमके झाले काय? याचा खुलासा करुन जनसामान्यांच्या मनात माजलेले काहूर दूर करावे, अशी मागणी मातंग समाजाच्यावतीने दादासाहेब क्षीरसागर यांनी केली आहे. मातंग समाजाचा मोर्चा हा सर्वसामान्यांचा असून यात कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विभागातून मातंग समाज मोर्चात सहभागी होत असून प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. दरम्यान उत्तमराव भैसने, सुनील घटाळे, गणेशदास गायकवाड, राजाभाऊ हातागडे, मेजर महादेव खंडारे, बबन इंगोले, प्रभाकर वाळसे, प्रमोद खंडारे, गणेश कलाणे, विजय गायकवाड आदींनी शंकर महाराजांना अटक करुन आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी मोर्चाद्वारे करण्यात येईल, असे सांगितले.