मान्सून दाखल
By Admin | Updated: June 18, 2014 23:50 IST2014-06-18T23:50:25+5:302014-06-18T23:50:25+5:30
रोहिणी नक्षत्र पूर्ण कोरडे गेले. मृगाची सुरूवात होऊन १० दिवस लोटले तरीही पावसाचा पत्त्ताच नाही. शेतीची मशागत आटोपलेली. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले. अखेर ही प्रतीक्षा संपली.

मान्सून दाखल
बुधवारी ६० मी.मी. पाऊस : पूर्वमान्सून पिकांना दिलासा
अमरावती : रोहिणी नक्षत्र पूर्ण कोरडे गेले. मृगाची सुरूवात होऊन १० दिवस लोटले तरीही पावसाचा पत्त्ताच नाही. शेतीची मशागत आटोपलेली. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले. अखेर ही प्रतीक्षा संपली. बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात मान्सूनचा दमदार पाऊस बरसला. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांवर मान्सूनने मेहेरबानी केली.
जिल्हाभरात ५० ते ८० मी.मी. पावसाची नोंद झाली. असह्य उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला. या पावसानंतर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांंची लगबग सुरू झाली आहे. इतकेतच नव्हे तर जिल्ह्यात हजार हेक्टरवर पेरणी झालेल्या मान्सूनपूर्व पिकांनासुध्दा हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. यावर्षी मान्सून गेल्या वर्षीच्या तुलनेत आठवडाभर लांबला. गेल्या वर्षी जून महिन्यात पावसाची सरासरी २०७ टक्क्यांपेक्षा अधिक होती. या पार्श्वभूूमीवर शेतकऱ्यांनी यावर्षीसुद्धा खरिपासाठी शेतीची मशागत केली. परंतु पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांना एका पावसाची आवश्यकता असते. ती गरज या दमदार पावसामुळे भरून निघाली आहे. पाऊस बरसल्याने कृषी केंद्रांवरची गर्दीदेखील वाढली आहे. त्यामुळे हा पाऊस सर्व घटकांना सुखावणारा ठरला आहे.
जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे पेरणीक्षेत्र एक हजार हेक्टरपेक्षा जास्त आहे. मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी जिल्ह्यात केली जाते. धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, अचलपूर तालुक्यात याचे प्रमाण अधिक आहे. या पिकाला पावसामुळे दिलासा मिळाला आहे.