२७० शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2015 00:25 IST2015-08-11T00:25:22+5:302015-08-11T00:25:22+5:30
मेळघाटातील बदलीस पात्र ठरलेल्या २७० हून अधिक शिक्षकांची १२ वर्षे उत्तम सेवा करूनही त्यांची बदली करण्यास जिल्हा परिषद प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे.

२७० शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण
जिल्हा परिषद प्रशासन अपयशी : १२ वर्षांपासून शिक्षक मेळघाटात
राजेश मालवीय धारणी
मेळघाटातील बदलीस पात्र ठरलेल्या २७० हून अधिक शिक्षकांची १२ वर्षे उत्तम सेवा करूनही त्यांची बदली करण्यास जिल्हा परिषद प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे. शासन निर्णयानुसार ३ वर्षांत बदली होणे बंधनकारक असतानाही मेळघाटातील शिक्षकांच्या १२ वर्षांपासून बदली होत नसल्यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. नगरविकास मंत्रालयाने बदली करण्यासंदर्भात आदेशीत करूनही प्रशासनाने कोणत्या कारणाने बदली प्रक्रिया थांबविली हे एक कोडेच आहे.
शासन नियमानुसार आदिवासी क्षेत्रात शासकीय कर्मचाऱ्याला ३ वर्षे सेवा देणे बंधनकारक आहे. मात्र जि.प. प्रशासनाने २००३-०४ मध्ये गुणवत्तेच्या आधारे २७३ शिक्षकांची नियुक्ती केली. त्यांनी दुर्गम विभागात १२ वर्ष उत्तम सेवा दिल्यानंतरही त्यांची बदली विविध कारणे दाखवून जि. प. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आजपर्यंत रोखण्यात आल्यामुळे कित्येक शिक्षकांना मानसिक व कौटुंबिक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाच्या नियमाला बगल देत पात्र शिक्षकांचे खच्चीकरण होत असल्यामुळे त्यांची काम करण्याची जिद्द व मानसिकता कमी झाल्याचे दिसून येते. नगरविकास मंत्रालयाने मेळघाटातील बदलीपात्र शिक्षकांची तत्काळ बदलीसंदर्भात जि. प. प्रशासनाला पत्र दिले आहे. मात्र ते पत्रही धूळ खात असल्याचे दिसत आहे. शासन निर्णय व आदेश असूनही बदली करण्यास मज्जाव करणाऱ्या प्रशासनाच्या त्रासापायी काही शिक्षक आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. काही शिक्षकांनी आर्थिक बळावर एक वर्षाच्या आत बदली मिळविली आहे, त्यांचीही चौकशी होणे गरजेचे झाले आहे.
कोरकू बोलीभाषेचा पेच कायम !
जिल्हा परिषद प्रशासनाने २००३-०४ मध्ये शिक्षक भर्ती केली. गुणवत्तेच्या आधारे २७३ शिक्षकांची नियुक्ती केली. याचवर्षी आदिवासी कोरकू भाषा अवगत असलेल्यांतून ४२६ शिक्षकांची नियुक्ती करताना नियुक्ती आदेशात त्यांची पूर्ण सेवा मेळघाटातच राहणार असून बदली होणार नाही, असा उल्लेख केला. मात्र गुणवत्ताधारक शिक्षकांची बदली होणे गरजेचे होते. मात्र जि. प. प्रशासनाने गुणवत्ता व कोरकू बोलीभाषा असा वाद असल्याचे शासनाची दिशाभूल करून २७३ बदलीपात्र शिक्षकांची बदली थांबविली आहे. नंतर शासनाचे सुधारित आदेश आल्यानंतरही त्याला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
शिक्षक आमदारांचे दुर्लक्ष
शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न व विविध समस्या शासनदरबारी मांडण्यासाठी मेळघाटातील पदवीधर शिक्षकांनी शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्रीकांत देशपांडे यांना निवडून दिले. मात्र आजपर्यंत आमदरांचे मेळघाटातील शिक्षकांच्या मुख्य बदलीसंदर्भात त्यांनी दुर्लक्ष केल्याने पदविधर शिक्षक नाराज आहेत.
शिक्षकांना शिक्षणासह अतिरिक्त कामे
शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सर्वात जास्त अतिरिक्त कामे दिली जातात. त्यामध्ये वर्षभर चालणाऱ्या मतदार यादी पूणर्निरीक्षणाची काम, शासनाच्या विविध योजनांची गावकऱ्यांना माहिती, विद्यार्थ्यांचे कागदपत्र जमा करण्यात जास्त वेळ, शाळा बांधकाम, विद्यार्थ्यांचा आॅनलाईन डाटा, विविध प्रकारची मासिक डाग वारंवार मागवून सादर करणे, शालेय पोषण आहाराचे रेकॉर्डसह इतर कामे करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेकडे प्रामुख्याने लक्ष आदी कामे शिक्षक सुरळीतपणे पार पाडतात. तरीदेखील प्रशासन अधिक कामाची अपेक्षा ठेवते. मात्र बदली करत नाही हे विशेष.
पदोन्नती, सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नती आदेश नाही
जिल्ह्यातील सेवाज्येष्ठ शिक्षकांचे केंद्र प्रमुख म्हणून मार्च २०१३ ला पदोन्नती देण्यात आली. मात्र पदोन्नतीला दोन वर्षे लोटल्यानंतरही आर्थिक रक्कमेपायी पदोन्नती पात्र सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नती आदेश जि. प. प्रशासनाकडून देण्यात आले नाही. यावरून जि. प. प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून येते.
जि. प. प्रशासनाने पात्र गुणवत्ताधारक शिक्षकांसह जिल्हा बदली व कोरकू बोलीभाषेतील शिक्षकांच्याही बदल्या कराव्यात. त्या रिक्त जागांवर मेळघाटातील शेकडो डी.एड. बेरोजगार उमेदवारांची भर्ती करावी, अशी शिक्षक सेनेसह सर्व शिक्षक संघटनांची मागणी आहे.
- शैलेष चौकसे, जिल्हा उपाध्यक्ष,
म. रा. शिक्षक सेना.
शासकीय कर्मचाऱ्यांचे ३ वर्षांनंतर बदलीचे शासन धोरण आहे. मेळघाटातील बदलीपात्र २७३ शिक्षकांची पूर्ण फाईल मागवून त्रुटी तपासून पुढील योग्य ती बदलीची कार्यवाही केली जाईल.
- अनिल लांडगे, प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी, जि.प.