कापूसतळणी मंडळात सरासरी सर्वात कमी पाऊस
By Admin | Updated: October 12, 2015 00:43 IST2015-10-12T00:43:18+5:302015-10-12T00:43:18+5:30
सप्टेंबर महिन्यातील पावसाच्या महसुली नोंदीनुसार तालुक्यातील कापूसतळणी मंडळात फक्त २६ मिमी पावसाची नोंद झाली ...

कापूसतळणी मंडळात सरासरी सर्वात कमी पाऊस
अंजनगाव सुर्जी : सप्टेंबर महिन्यातील पावसाच्या महसुली नोंदीनुसार तालुक्यातील कापूसतळणी मंडळात फक्त २६ मिमी पावसाची नोंद झाली असून या अवर्षणाचा पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे. महिनाभऱ्यात या मंडळात जेमतेम तीन दिवस पाऊस बरसला. आधीच कोरडवाहू भाग असलेल्या या मंडळातील खरीप शेती पावसाळ्यातील अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडली आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वात जास्त पाऊस १३५ मिमी अंजनगाव मंडळात पडला. त्या खालोखाल कोकर्डा मंडळात १२७ मिमी, भंडारज मंडळात ८५ मिमी, विहीगाव मंडळात ८१ मिमी, सातेगाव मंडळात ७४ मिमी पावसाची नोंद झाली. यावर्षी सप्टेंबरअखेर अंनगाव तालुक्यात ६५३ मिमी पावसाची नोंद झाली. जी गतवर्षीच्या नोंदीपेक्षा फक्त ३७ मिमीने जास्त आहे. सप्टेंबर महिन्यात फक्त सहा दिवस पाऊस पडला. शहानूर धरणातही गतवर्षीपेक्षा एक दशलक्ष घ.मी.ने कमी पाणीसाठा असून पाण्याची पातळीसुध्दा दोन मिटरने कमी झाली आहे.
राज्यातील अपुऱ्या पावसामुळे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने संभाव्य पाणी टंचाईच्या उपाययोजना केल्या आहेत. यावर्षी नव्या शासनाने गावनिहाय आपात योजना आराखडा तयार केला आहे. अशा योजना तयार करुन प्रत्यक्षात लागू होईपर्यंत अनेक दिवस निघून जातात, असे होऊ नये. म्हणून प्रथमच आॅक्टोबरपासून पाणी टंचाई यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. त्यानुसार शासनाद्वारे घोषित भूजलाची खोल पाणी पातळी असलेल्या व अवर्षणग्रस्त क्षेत्रात विहिरींच्या पाणी उपशावर बंदी येणार आहे.
टंचाईग्रस्त गावांची यादी आतापासूनच तयार करण्यात आली आहे. या पाणी टंचाईच्या काळात गतकाळात अनियमिततेला कुठेही थारा राहू नये राहू नये, म्हणून दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरासरीपेक्षा पन्नास टक्के कमी पाऊस झालेल्या आणि भूमिगत पाण्याची पातळी दोन मिटरने कमी झालेल्या गावांना टंचाईग्रस्त गाव घोषित करण्यात येईल. पाणी पुरवठा करणारे सर्व टँकर्स उपग्रहाच्या जीपीएस यंत्रणेने संगणकाशी जोडलेले राहतील. जेणेकरुन त्यांची खरी कामगिरी लक्षात येईल.
शहानूर पाणी पुरवठ्यातील टंचाईग्रस्त गावांचा आढावा घेण्याची गरज
तालुक्यातील बोराळा, कुंभारगाव, भंडारज, जवर्डी, कारला, काळगव्हाण आदी गावात शहानूर पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे. वारंवार यंत्रणेला माहिती देवून सुध्द ायावर कोणतीही आवश्यक उपाययोजान झाली नाही. अयोग्य नियोजनामुळे व देखभाल आमि दुरुस्तीची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना उपाशी ठेवल्यामुळे येथील पाणी पुरवठा योजना वाऱ्यावर आहे. याबाबत संबंधीत गावकरी व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अनेकदा निर्माण झाला आहे. उन्हाळ्याचे प्रारंभी येथे पाणी समस्या तिव्र होते म्हणून या गावांमध्ये जूनी ग्रामपंचायत बोअरवेल पाणी पुरवठा योजना पुर्नजीवीत करणे व थकीत विज बिले भरुन पर्यायी व्यवस्था गावकऱ्यांना उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.