पाच हजार किलोमीटरने सरकला भारताचा भूभाग
By Admin | Updated: February 28, 2015 00:35 IST2015-02-28T00:35:29+5:302015-02-28T00:35:29+5:30
आशिया खंडातील भारत देशाचा भूभाग मूळ जागेवरून तब्बल पाच हजार किलोमीटर अंतरापर्यंत सरकला असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील

पाच हजार किलोमीटरने सरकला भारताचा भूभाग
वैभव बाबरेकर अमरावती
आशिया खंडातील भारत देशाचा भूभाग मूळ जागेवरून तब्बल पाच हजार किलोमीटर अंतरापर्यंत सरकला असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागप्रमुख सय्यद फजल रहेमान खादरी यांनी संशोधनांतून मांडला. खादरी हे भूगर्भशास्त्राचे विभागप्रमुख व भूगर्भ संशोधक आहेत.
खादरी यांनी या संशोधनासाठी खंड वाहकाच्या सिध्दांताचा आधार घेतला. ६०० लाख वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीत भारताचा भूगाग १८० डिग्रीने फिरला व भूभागाचे उत्तर-पूर्व दिशेने वहन सुरु झाले. त्यावेळच्या भूभागाची दिशा व आताच्या दिशेशी जुळत नसल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले आहे.
हिमालयावर आजही आढळतात समुद्रातील अवशेष
भारतात विविध ठिकाणी पसरलेला ज्वालामुखी थंड होऊन दगड मातीमध्ये रुपांतरित झाला होता. तेव्हापासून काळे दगड अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यानंतर ५० मिलिनियम वर्षांनंतर उलथापालथ झाली व समुद्रालगतची जागा उंचावली. त्यामुळे हिमालयाच्या पर्वतरांगा तयार झाल्या. आजही या पर्वतरांगांच्या टोकावर समुद्रातील अवशेष आढळतात. हिमालय पर्वत श्रुंखलेत सर्वात उंच एव्हरेस्ट पर्वत असून त्याची उंची ८,८४८ मीटर म्हणजे ९ किलोमीटर उंच आहे. तसेच उंचीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर काश्मीर येथील के-२ पर्वत आहे.
तापमानावर चुंबकत्वाचे प्रमाण
बेसाल्ट या खडकामध्ये ०.५ ते १ टक्के चुंबकीय खनीज आहे. ज्वालामुखीचे तापमान १२०० डिग्री सेंटीग्रेट असल्याने हे खडक वितळतात. तापमान अधिक असतानाच या काळ्या दगडाचे चुंबकत्व बदलू शकते. तापमान वाढले की चुंबकत्व कमी होते व थंड झाले की वाढते. सद्यस्थितीत काळ्या दगडावरील अवशेष आढळले आहे.
'अॅथिनोस्पीअर' पदार्थावर तरंगतोय भूखंड
भारताचा भूभाग हा उत्तर-पूर्व दिशेने वढत आहे. तेव्हापासून पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश हे भारताशी जोडलेले आहेत. त्यावेळी ज्वालामुखीतून (हॉटस्पॉट) निघालेला लाव्हा भारतातील १० लाख स्केअर किलोमीटर भूभागात पसरला आहे. जमिनीच्या आत १०० किलोमीटरवर 'अॅथिनोस्पीअर' हा पदार्थ आहे. त्यावर असणारा हा भूखंड नॉर्थ-ईस्ट दिशेने सरकत गेल्याने भारताचा भूखंड वेगळा झाला. अवघ्या काही वर्षांपूर्वी अंदमान-निकोबार या बेटांवर ज्वालामुखीचा उद्रेक झाला. खडकांच्या नमुन्यावरून त्या ठिकाणी आढळलेल्या खडकाची दिशा व तयार झाल्याचे वर्ष तंतोतंत जुळविता येते, असे सै. फजल रहेमान खादरी यांनी सांगितले.