सोयाबीनचे क्विंटलऐवजी किलोत उत्पादन
By Admin | Updated: October 30, 2014 22:45 IST2014-10-30T22:45:53+5:302014-10-30T22:45:53+5:30
पावसाचे अपुरे प्रमाण, अनियमित पाऊस, वातावरणातील बदल त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. दिवाळीपूर्वी येणारे सोयाबीनचे पीक यंदा दिवाळी संपूनही हाती आले नाही.

सोयाबीनचे क्विंटलऐवजी किलोत उत्पादन
चांदूरबाजार : पावसाचे अपुरे प्रमाण, अनियमित पाऊस, वातावरणातील बदल त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. दिवाळीपूर्वी येणारे सोयाबीनचे पीक यंदा दिवाळी संपूनही हाती आले नाही. आले ते उत्पादन क्विंटलऐवजी किलोत आहे. त्यामुळे गणोजा, सोनोरी परिसरातील सोयाबीन उत्पादकांनी पीक काढणीचा खर्च तरी वाचेल म्हणून उभे पीकच वखरुन टाकले आहे.
तालुक्यात २१ हजारांवर हेक्टरमध्ये सोयाबीनचे पीक होते. त्यात ६० टक्के शेतामधील सोयाबीनचे उत्पादन झाले तर ४० टक्के शेतातील सोयाबीन अज्ञात रोगामुळे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. यावर कळस म्हणजे अत्यल्प प्रमाणात उत्पादन झालेले सोयाबीन कुठे विकायचे, अशी स्थिती आल्याने ते बाजारातून हरपले आहे. कापूस खरेदीचा मुहूर्त नसल्याने शेतकरी पूरता आर्थिक अडचणीत सापडला आहे. यात सुरुवातीला अस्मानी संकटाने समस्या निर्माण केली तर त्यानंतर तीन महिन्यापासून सरकारच अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांचा नेमका वाली कोण? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
एकीकडे खरीप हंगाम हातचा गेला तर दुसरीकडे रबी हंगामाचे नियोजन आर्थिक अडचणींमुळे कोलमडले आहे. चारही बाजंूनी शेतकरी अडचणीत सापडला आहे. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात, दिवाळीच्या मोसमात राज्यात एकाच दिवशी तब्बल सात शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे वास्तव विसरून चालणार नाही. सोयाबीनचे उत्पादन नाही. उत्पादन खर्चाचाही भुर्दंड शेतकऱ्यांवर बसला असताना रोखीचे पीक म्हणून आता शेतकऱ्यांचे भवितव्य कापसावर अवलंबून आहे. कापसाच्या हमी भावातही शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दिसत आहे.
शासनाने यंदा कापसाचा हमीभाव जाहीर करताना क्विंटलमागे ५० रूपयाची वाढ करून शेतकऱ्याविषयीचा कळकळा दाखवून दिला आहे. उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली. खते, तणनाशके, किटकनाशके, मजुरीत प्रचंड वाढ झाली आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च एकरी १२ हजार रूपये आहे, बागायती कपाशी एकरी ३५ हजार तर कोरडवाहू १८ ते २० हजारापर्यंत उत्पादन खर्च येतो. सोयाबीन उच्च प्रतिचा ३ हजार तर कपाशी उच्च प्रतीची ३ हजार ८०० रूपये, कपाशीवरही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काही ठिकाणी कापसाची झाडे उपटून हरभरा पेरण्यात आला. इतकी दयनीय अवस्था सध्या शेतकऱ्यांची झाली आहे.
नेते मंडळी दोन महिन्यापासून निवडणुकीत व्यस्त होती तर शेतकरी पिकांचे भविष्य शोधत होता. निवडणुकीत आश्वासनाचा पूर वाहत असला तरी शेतकरी मात्र पावसाच्या एका थेंबासाठी तडफडत होता.
आता तर रबी पिकासाठी जमिनीत ओलावा नाही, ही नवीन समस्या आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)