भारनियमनामुळे सिंचनाचा प्रश्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:46 IST2017-10-29T22:45:48+5:302017-10-29T22:46:18+5:30
कॅलिफोर्निया म्हणून विदर्भात परिचित असलेले मोर्शी-वरुड तालुक्यात भारनियमन वाढल्याने सिंचनाची कामे ठप्प आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.

भारनियमनामुळे सिंचनाचा प्रश्न!
लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : कॅलिफोर्निया म्हणून विदर्भात परिचित असलेले मोर्शी-वरुड तालुक्यात भारनियमन वाढल्याने सिंचनाची कामे ठप्प आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. मागील दोन वर्षांत भूजल पातळी वाढली असताना भारनियमनामुळे संत्राबागांना व पिकांना फटका बसला. भारनियमनामुळे संत्राबागांना जगविणे कठीण झाले असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
तालुक्यात सिंचनाखाली मोठ्या प्रमाणावर शेती असून हजारो हेक्टर जमीवर संत्राबागा फुलविल्या आहेत. संत्रा, मिरची, कपाशीसह आदी पिकांना या महिन्यात पाण्याची सक्त आवश्यकता असते. परंतु विहिरीत पाणी आहे. मात्र वीजपुरवठा नाही, अशी परिस्थती असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. विशेष म्हणजे यंदा संत्रा झाडांवर आलेल्या रोगामुळे योग्य वेळी पाणी दिल्यास संजीवनी मिळू शकते, असे कृषी विभागाने सांगितले. यामुळे सिंचन करून झाडे जगविण्याचा प्रयत्न केला असताना भारनियमनाचा खोडा समोर उभा ठाकला आहे. कृषी विभागाकडून अनुदानावर मिळालेले केरोसीन पंप आता कालबाह्य झाले आहेत. दुसरीकडे केरोसीन मिळत नसल्याने अनेकांचे पंप धूळखात पडले आहेत.
शेतकरीच करतात दुरुस्ती
भारनियमन व अनिश्चित बिघाड या दोन्ही गोष्टींमुळे शेतकरी त्रस्त आहे. तक्रारी, विनंती करूनही अवेळी बिघाड काढण्यास वीज कर्मचारी येत नाही, तर बिघाड दुरुस्त झाल्यास वीज भारनियमन असते. यामुळे एक-दोन दिवस विनाकारण वाया जातात. परिणामी शेतकरी स्वत:च संबंधित रोहित्रांवर जाऊन दुरुस्ती करीत असल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.
लोंबकळलेल्या तारांचाही प्रश्न
शेतामधून जाणाºया विद्युत तारांना गार्डींग नसल्याने अनेक ठिकाणी तारा लोंबकळलेल्या आहेत. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचारी सपशेल दुर्लक्ष करीत आहेत.
जबाबदारी कुणाची ?
कुठलीही तांत्रिक माहिती किंवा सरंक्षण नसताना केवळ पिके वाचविण्याकरिता जीव धोक्यात घालून शेतकºयांना वीज दुरुस्ती करावी लागत असल्याने अपघात झाल्यास या शेतकºयांची जबाबदारी कुणावर, हा प्रश्न निर्माण होतो. यामुळे आता राज्य शासनाने वीज कंपनीकडून शेतकºयांनाच विद्युत दुरुस्तीचे तांत्रिक प्रशिक्षण द्यावे अन्यथा वीज कर्मचारी वेळेवर पाठवून त्वरित वीजपुरवठा सुरु करावा, अशी मागणी आहे.
संत्रापिकांना योग्यवेळी पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र भारनियमन असल्याने त्यांना ऐनवेळेवर पाणीच मिळत नसल्याने संत्राबागा जगविणे कठीण झाले आहे. या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
- विलास तट्टे, संत्रा उत्पादक