भरपाईसाठी १४,४७० शेतकऱ्यांचे ‘इंटिमेटम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:14 IST2021-09-19T04:14:14+5:302021-09-19T04:14:14+5:30
अमरावती : नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीमुळे पीक विमा सरंक्षित रक्कमेच्या २५ टक्के भरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यातील १४,७४० शेतकऱ्यांनी कंपनीकडे पूर्वसूचना ...

भरपाईसाठी १४,४७० शेतकऱ्यांचे ‘इंटिमेटम’
अमरावती : नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीमुळे पीक विमा सरंक्षित रक्कमेच्या २५ टक्के भरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यातील १४,७४० शेतकऱ्यांनी कंपनीकडे पूर्वसूचना अर्ज (इंटिमेशन) दाखल केले आहे. मात्र, एकाही शेतकऱ्याला भरपाई देण्यात आलेली नसल्याने या विमा कंपनीवर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे.
जिल्हा प्रशासनाचे माहितीनुसार, सष्टेंबरपूर्वी ९,३८५ व या महिन्यात ५,३५५ शेतकऱ्यांनी विमा कंपनीला पीक नुकसानीबाबत पूर्वसूचनापत्र सादर केलेली आहे. योजनेच्या निकषानूसार विमा संरक्षित रक्कमेच्या २५ टक्के भरपाई शेतकऱ्यांना देय आहे. या सर्व ठिकाणी कंपनीच्या प्रतिनिधीद्वारा पाहणीदेखील करण्यात आलेली आहे. याशिवाय महसूल व कृषी विभागाद्वारा प्राथमिक अहवालात नुकसानीची नोंद करण्यात आलेली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद आदी पिके जोमात असताना ऑगष्ट व सप्टेंबर महिन्यात झालेला संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतात पाणी साचले तर नदी-नाल्याकाढची पिके खरडून गेली आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार, किमान ५० हजारवर हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. नियमानूसार या सर्व शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचे ७२ तासांच्या आत ही माहिती शासनाने दिलेल्या सहा पर्यायाचे आधारे पीक विमा कंपनीला सादर केलेली आहे.
बॉक्स
कृषिमंत्र्यांचा दणका, तरीही कारवाई शून्य
कृषी मंत्र्याच्या जिल्हा दौऱ्यात विमा कंपनीचे कार्यालय त्यांना आढळून आलेले नव्हते, याशिवाय पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांच्या तीन हजारावर अर्जाची दखल कंपनीद्वारा घेण्यात न आल्यामुळे या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश ना. दादाजी भुसे यांनी दिले होते. त्यानंतरही कंपनीमध्ये फारसा फरक पडला नाही. १४,७४० शेतकऱ्यांना अध्यापही भरपाई देण्यात आली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
बॉक्स
असे आहेत तालुकानिहाय अर्ज
यंदाच्या खरिपामध्ये अचलपूर तालुक्यात ५५, अमरावती २,२३९, अंजनगाव सुर्जी ६४८, भातकुली ५,७७९,चांदूर रेल्वे ३४६, चांदूर बाजार ३९८, चिखलदरा २, दर्यापूर २,४४२, धामणगाव रेल्वे १३२, धारणी ३२५, मोर्शी ९२, नांदगाव खंडेश्वर १,९५४, तिवसा २७८ व वरुड तालुक्यात ५२ शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत कंपनीकडे पूर्वसूचना अर्ज दाखल केले आहे.
कोट
कंपनीस्तरावर अर्जानुसार बाधित पिकांची पाहणी करण्यात आलेली आहे. पीक संरक्षित रक्कमेच्या आवश्यक प्रमाणात भरपाई देण्यासाठी पीक विमा कंपनीला पत्र व सूचना देण्यात आल्या आहेत.
अनिल खर्चान
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी