अमरावती : हल्ली भारतीय वनसेवा अधिकारी (आयएफएस) यांच्या बदल्यांची धूम आहे. ‘क्रीम’ पोस्टिंग पदरात पडावे, यासाठी वन मंत्रालयात तब्बल ५० ते ५५ अधिकाऱ्यांनी ठिय्या मांडल्याची माहिती आहे. मलईदार जागेसाठी सचिवांपासून तर पीएस अशी धावाधाव सुरू आहे, तर २७ नवीन ‘आयएफएस’ अवाॅर्डप्राप्त ‘डीसीएफ’ यांची मुंबईवारी जोरात सुरू आहे. ‘आयएफएस’च्या बदल्यांसाठी एक, दोन दिवसात बदली समितीची बैठक होईल, असे संकेत आहेत.
वन विभागात राज्यस्तरावर केवळ २२९ आरएफओंच्या बदल्या करण्यात आल्या असून, विभागीय वन अधिकारी, सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या अद्याप झालेल्या नाहीत. याशिवाय अनेक अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर येथील वन भवनात एकाच शाखेत ठाण मांडून आहेत. तसेच उपवनसंरक्षक दर्जाच्या ५५ ते ६०पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचा बदल्या अद्याप झालेल्या नाहीत. यात २० ते २२ बदलीपात्र उपवनसंरक्षकांना ‘आयएफएस’ पदस्थापना करणे गरजेचे झाले आहे. अनेक अवाॅर्डप्राप्त डीसीएफ ‘क्रीम’ पोस्टिंगसाठी राजकीय आश्रयाला गेल्याची माहिती आहे. ‘आयएफएस’ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत, हे विशेष.
‘त्या’ २७ आयएफएसची क्रीम जागांवर नजरकेंद्र शासनाच्या पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे अवर सचिव प्रदीपकुमार यांनी ३ जून २०२५ रोजी महाराष्ट्रातील तब्बल २७ विभागीय वन अधिकाऱ्यांना राज्य कोट्यातून भारतीय वनसेवेत पदोन्नती दिली आहे. त्यामुळे या आठवड्यात होणाऱ्या बदलीत या २७ आयएफएस यांनी ‘क्रीम’ जागांवर पाेस्टिंंगसाठी नजर वळविली आहे. त्यामुळेच मंत्रालयात आयएफएसची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.
‘संकल्प’ला भेटल्याशिवाय ‘पोस्टिंग’ नाही?हल्ली मंत्रालयात ‘संकल्प’ची मोठी चलती आहे. भारतीय वन सेवेतील बड्या अधिकाऱ्यांनासुद्धा त्यापुढे नतमस्तक व्हावे लागते. पद, मलईदार खुर्चीसाठी कोण, कोणत्या स्तराला जाईल, याचे उदाहरण मंत्रालयात अनुभवता येत आहे. आयएफएस यांनासुद्धा ‘संकल्प’ची भेट घ्यावीच लागते, त्याशिवाय पदस्थापनाच मिळत नाही, असा अलिखित फतवा जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ‘संकल्प’ कोण? याची मोठी चर्चा सुरू आहे.
वन विभागात भावसे संवर्गाची चलतीसद्यस्थितीत राज्यसेवेतील विभागीय वन अधिकारी संवर्गाच्या मंजूर १०९ पदांपैकी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या पाच पदांवर ‘भाव’ या निकषानुसार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना करण्याचा घाट शासनाने घातलेला दिसत आहे. भावसे संवर्गातील उपवनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या पदावर पदस्थापना करून घेण्यासाठी चढाओढ चालविली आहे. त्यामुळे राज्यसेवेतील अधिकाऱ्यांच्या बदली पदस्थापना व पदोन्नती प्रभावित होत आहेत. मात्र, वन विभागात फक्त भावसे संवर्गाची चलती असल्याचे वास्तव आहे.