वादळी पाऊस, वृक्ष कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST2020-06-11T05:00:00+5:302020-06-11T05:01:24+5:30
शहरात बुधवारी दुपारी ४ वाजता वादळासह तासभर दमदार पाऊस झाल्याने अनेक भागांत नुकसान झाले. १० ठिकाणी रस्त्यांवर, दोन ठिकाणी घरांवर व जिवंत वीज तारांवर झाडे कोसळली. काही घरांमध्ये व खोलगट भागांतील वस्त्यांमध्ये पावसाचे व नाल्यांचे पाणी शिरले. शहरात १७ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी यंदाच्या पहिल्याच पावसाने शहराच्या आपत्ती व्यवस्थापनाची पोलखोल केली आहे.

वादळी पाऊस, वृक्ष कोसळले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात बुधवारी दुपारी ४ वाजता वादळासह तासभर दमदार पाऊस झाल्याने अनेक भागांत नुकसान झाले. १० ठिकाणी रस्त्यांवर, दोन ठिकाणी घरांवर व जिवंत वीज तारांवर झाडे कोसळली. काही घरांमध्ये व खोलगट भागांतील वस्त्यांमध्ये पावसाचे व नाल्यांचे पाणी शिरले. शहरात १७ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी यंदाच्या पहिल्याच पावसाने शहराच्या आपत्ती व्यवस्थापनाची पोलखोल केली आहे.
दिवसभर ढगाळ वातावरणानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अर्धातासपावेतो एकसारखा पाऊस पडला त्यानंतर थोडा जोर ओसरला. वाऱ्यासह पावसाने शहरात चांगलेच नुकसान झाले. बडनेरा, नवसारी, शेगाव नाका, समाधाननगर, महेंद्र कॉलनी, काळ्या मारोतीजवळ, गणेश कॉलनी, आंबेडकरनगर व बेलपुऱ्यात झाडे कोसळल्याच्या तक्रारी शहराच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे नोंद झालेल्या आहेत. याव्यतिरिक्त अनेक भागांतही लहान-मोठे वृक्ष व फांद्या कोसळल्याची माहिती आहे. शहरालगतच्या कठोरा बु. येथे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेच्या संरक्षक भिंतीवर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.
महेंद्र कॉलनी परिसरात पाणी शिरले व पोटे टाऊनशीपलगतच्या भागातही पाणी साचल्याने व खोलगट भागांत असलेल्या काही पोलीस क्वाटर्समध्येही पाणी शिरल्याचे दिसून आले. बाजारपेठतही नागरिकांची तारांबळ व दुकानदारांची दाणादाण उडाली असल्याचे दिसून आले.
अनेक भागातील वीज पुरवठा खंडित
वाºयामुळे येथील कठोरा नाका, रहाटगाव व वलगाव रोडवर काही ठिकाणी विद्युत तारांवर झाडे कोसळल्याने हा परिसर अंधारात आहे. शहरात किमान १० ठिकाणी या वादळामुळे विद्युत पुरठ्यात खंड आलेला आहे व यंत्रणेद्वारा शोध निवारण केल्या जात असल्याचे महावितरणचे शहर कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांनी सांगीतले. अमरावती ग्रामीणमध्ये नांदगाव पेठ, बडनेरा, रहाटगाव आदी भागांतील वीजपुरवठा खंडित झाला.