भूजल पातळी : रेड झोनमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:01 IST2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:01:11+5:30
अचलपूर तालुक्यात २.३५ मीटर, अमरावती ०.४७ मीटर, भातकुली ०.५९ मीटर, चांदूर रेल्वे ०.८८ मीटर, धामणगाव रेल्वे ०.६६ मीटर, चिखलदरा १.१९ मीटर, चिखलदरा २.२२ मीटर, धारणी १.६३ मीटर, मोर्शी २.०७ मीटर, नांदगाव खंडेश्वर १.३९ मीटर, तिवसा १.६३ मीटर व वरूड तालुक्यात १.४६ मीटरने वाढ झाली आहे. याउलट अंंजनगाव सुर्जी तालुक्यात २.७० मीटर व दर्यापूर तालुक्यात ०.०८ मीटरने भूजलात तूट आलेली आहे.

भूजल पातळी : रेड झोनमध्ये वाढ
गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मागील वर्षी ऑगस्टनंतर झालेला दमदार पाऊस, नव्याने झालेली जलसंधारणाची कामे यामुळे जलपुर्नभरण झाल्याने जिल्ह्यात १२ तालुक्यांतील भूजलपातळीत सरासरी १.३८ मीटरने वाढ झालेली आहे. यात रेड झोनमध्ये दिलासा मिळाला आहे. त्याच्या तुलनेत खारपाणपट्ट्यातील अंजनगाव सुर्जी व दर्यापूर तालुक्यात घट आलेली आहे. जिल्ह्यात १५० निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीचे निरीक्षण नोंदविल्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे (जीएसडीए) हे निरीक्षण नोंदविण्यात आले.
सदर विभागाद्वारे मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तालुकानिहाय भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास करून जिल्ह्यातील भूजल स्थितीच्या तालुकानिहाय नोंदी जाहीर करण्यात आलेल्या आहे. लॉकडाऊनमुळे या विभागाद्वारे मार्चअखेरचे निरीक्षण नोंदविण्यात आलेले नव्हते. त्यामुळे जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील भूजलाची स्थिती कशी आहे, या विषयीची सर्वत्र उत्सुकता असताना या आठवड्यात जिल्हा भूजल स्थिती जाहीर झालेली आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे जिल्ह्यातील १५० निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीच्या नोंदी घेतल्यानंतर भूजलाची जिल्हास्थिती स्पष्ट झालेली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यात २.३५ मीटर, अमरावती ०.४७ मीटर, भातकुली ०.५९ मीटर, चांदूर रेल्वे ०.८८ मीटर, धामणगाव रेल्वे ०.६६ मीटर, चिखलदरा १.१९ मीटर, चिखलदरा २.२२ मीटर, धारणी १.६३ मीटर, मोर्शी २.०७ मीटर, नांदगाव खंडेश्वर १.३९ मीटर, तिवसा १.६३ मीटर व वरूड तालुक्यात १.४६ मीटरने वाढ झाली आहे. याउलट अंंजनगाव सुर्जी तालुक्यात २.७० मीटर व दर्यापूर तालुक्यात ०.०८ मीटरने भूजलात तूट आलेली आहे. खारपाणपट्ट्यातील दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील काही भागांत भूजलाचा उपसा होत नसताना घट धक्कादायक आहे.
अंजनगाव, दर्यापूरसाठी धोक्याची घंटा
दर्यापूर तालुक्यासह अंजनगाव सुर्जी तालुक्याचा काही भाग हा खारपाणपट्यात येतो. त्यामुळे या तालुक्यात भूजलाचा उपसा साहजिकच कमी आहे. या उलट जलसंधारणाची सर्वाधिक कामे या तालुक्यांमध्येच आहे. गतवर्षी दर्यापूर तालुक्यात सरासरीच्या ११० व अंजनगाव सुर्जी तालुक्यांत सरासरीच्या १०१ टक्के पाऊस झालेला असताना या दोन्ही तालुक्यात भूजलात घट ही आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे.
तूट असणाऱ्या अचलपूर तालुक्यात वाढ
दोन वर्षांपासून विदर्भात भूजलाची सर्वाधिक तूट असणाºया अचलपूर तालुक्यात यंदा सर्वाधिक २.३५ मीटरने वाढ झाल्याने दिलासा मिळाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात सर्वाधिक कमी म्हणजे सरासरीच्या ७० टक्केच पाऊस झालेल्या भातकुली तालुक्यात भूजलात मोठ्या प्रमाणात तूट येणार, अशी अपेक्षा असताना या तालुक्यात भूजल पातळीत ०.५९ मीटरने वाढ झाली. हा सुखद धक्का आहे.
मोर्शी, वरूड तालुक्यांना दिलासा
भूजलाचा अमर्याद उपशाच्या मोर्शी व वरूड तालुक्यात महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ नुसार उपशावर नियंत्रण, याच अधिनियमाचे आठ (१) मधील तरतुदीनुसार नवीन विहिरीला बंदी आहे. मात्र, मोर्शी तालुक्यात २.०७ मी. व वरुड तालुक्यात १.४६ मीटरने भूजलात वाढ झाली आहे.