‘त्या’ ४ आमदारांच्या पत्राची वनमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; आरएफओंच्या बदल्यांमध्ये शिरले अर्थकारण
By गणेश वासनिक | Updated: June 3, 2023 18:01 IST2023-06-03T17:59:05+5:302023-06-03T18:01:16+5:30
मंत्री, आमदारांनीही शिफारशी केल्याची धक्कादायक माहिती

‘त्या’ ४ आमदारांच्या पत्राची वनमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; आरएफओंच्या बदल्यांमध्ये शिरले अर्थकारण
अमरावती : राज्यात वन परिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बदल्यांना शासनाने स्थगिती दिल्यामुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, आता ‘त्या’ चार आमदारांनी दिलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बदलीप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. आरएफओंच्या बदल्यांसाठी काही मंत्री, आमदारांनीही शिफारशी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या झालेल्या १५० बदल्यांना शासनाने उपसचिव भगवान सावंत यांनी २ जूनला स्थगिती दिली. तथापि बदलीनंतर अनेक अधिकारी नव्या पदावर रूजू झाले असून या स्थगितीमुळे पुढे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वनबल प्रमुख वाय.एस.पी. राव यांनी लोकप्रतिनिधी प्रशासनावर कसा दबाव आणणात, हे शिफारस पत्र सार्वजनिक केल्यामुळे पारदर्शक कारभाराला सुरूंग लागला. विशेष म्हणजे राज्याचे वनमंत्री सुधीर मुंगटीवार हे विदेशात असताना वन भवनातून ३३ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना विभाग बदल करण्यात आले.