राज्यातील १,१६६ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक जाहीर; १३ ऑक्टोबरला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2022 17:52 IST2022-09-07T17:51:47+5:302022-09-07T17:52:16+5:30
आचारसंहिता लागू, सरपंच थेट जनतेतून

राज्यातील १,१६६ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक जाहीर; १३ ऑक्टोबरला मतदान
गजानन मोहोड
अमरावती : राज्यात ८२ तालुक्यातील १,१६६ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला, त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी आरक्षण राहील, याशिवाय थेट जनतेमधून सरपंच निवडल्या जाईल.
जानेवारी २०२१ ते मे २०२२ पर्यंत मुदत संपलेल्या व जून ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया राहील. राखीव प्रभागात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना हमीपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २१ ते २७ सप्टेंबर, छाननी २८ ला, उमेदवारी अर्जाची माघार ३० ला व मतदान १३ ऑक्टोबरला मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असेल. मतमोजणी १४ ऑक्टोबरला होईल.