गब्बरसिंग आणि सिंघम उतरले मैदानात; मेळघाटातील आग संरक्षणासाठी झळकले पोस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 13:13 IST2021-03-19T13:12:49+5:302021-03-19T13:13:19+5:30
Amravati News मेळघाटातील जंगलात उन्हाळ्यात लावण्यात येणारा वणवा रोखण्यासाठी सोशल मीडियावर अपलोड करण्यात येणारे शोले सिनेमातील गब्बरसिंग आणि ठाणेदार सिंघम यांचे पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे.

गब्बरसिंग आणि सिंघम उतरले मैदानात; मेळघाटातील आग संरक्षणासाठी झळकले पोस्टर
नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाटातील जंगलात उन्हाळ्यात लावण्यात येणारा वणवा रोखण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने आदिवासी पाड्यांच्या दर्शनी भागावर संरक्षणार्थ फलक लावण्यात येतात. अशातच सोशल मीडियावर अपलोड करण्यात येणारे शोले सिनेमातील गब्बरसिंग आणि ठाणेदार सिंघम यांचे पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे.
मेळघाटच्या जंगलात दरवर्षी आगी लावण्याचे प्रकार सर्वाधिक प्रमाणात घडत आहेत. त्यात हजारो हेक्टर जंगलाची राखरांगोळी होते. दुसरीकडे साप, विंचू अशा सरपटणा?्या प्राण्यांपासून वाघ, अस्वल, बिबट, रानगवे, हरिण, सांबर, नीलगाय आदी प्राण्यांना जंगलात जीव वाचवीत सैरभर पळावे लागत आहे. या आगीत प्राण्यांचा होरपळून मृत्यूसुद्धा होतो. ही आग वन्यप्राण्यांसह मेळघाटच्या घनदाट अरण्याची राखरांगोळी करणारी ठरते. कोट्यवधी रुपयांची वनसंपदा यात जळून खाक होत असल्याचे वास्तव आहे.
मानवनिर्मित आगी सर्वाधिक प्रमाणात
मेळघाटच्या जंगलात लागणारी आग ही पूर्वी बांबूंच्या घर्षणाने उन्हाळ्यात लागत असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र आग मानवनिर्मित असल्याचे सत्य आहे. वन आणि व्याघ्र प्रकल्प त्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात जनजागृती करते. मेळघाटच्या जंगलात मोहाची झाडे सर्वाधिक आहेत. त्याची मोहाफूल लवकर वेचता यावी, जंगलात गवतात पडलेली बारसिंग वेचण्यासह, तेंदुपत्ताला येणारी कोवळी पाने लवकर फुटावी. दुसरीकडे गुराढोरांसाठी चांगले गवत उगावे, यासाठी या आगी लावल्या जात असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून पुढे आले आहे.
जीवघेणी कसरत, उलटी बत्तीचा प्रयोग
मेळघाटचे जंगल उंच-सखल टेकड्यांमध्ये वसलेले आहे. जंगलात आग लागल्यावर ती पाहण्यासाठी मचाणीची व्यवस्था, दुसरीकडे आता सॅटॅलाइटने माहिती मिळवण्याचा प्रयत्न असतो. प्रत्यक्षात आग लागलेल्या ठिकाणी जाण्यासाठी क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांना जीवघेणी कसरत करावी लागते. आग विझवण्यासाठी पाण्याचे बंब किंवा हेलिकॉप्टर आदींचा प्रयोग मेळघाटात शक्य नाही. जंगलात आग लागल्यास ब्लोअर मशीनचा वापर होतो. मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्यास ती रोखण्यासाठी काही अंतरावर दुसरीकडून आग लावल्या जाते त्याला उलटी बत्ती असे म्हणतात. हा प्रयोग आजही मेळघाटात करावा लागत आहे.
अरे ओ सांभा.... आली रे आली आता
जंगलातील आग ही मानवनिर्मित असल्याने मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून सोशल मीडियावर सुद्धा आता शोले चित्रपटातील ह्यअरे ओ सांभा जंगल मे आग लगाने पे सरकार कितना जुमार्ना रखे है, सरदार पुरे पाच हजार और दो साल की जेल, यासह सिंघम चित्रपटातील ह्यआली रे आली आता जंगलाला आग लावणाऱ्यांची बारी आलीह्ण असे पोस्टर अपर प्रधान मुख्य संरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांनी सोशल मिडियावर अपलोड केले आहेत.