‘एटीएम'ची सुरक्षा करतात ‘भावी अधिकारी’
By Admin | Updated: May 30, 2015 00:32 IST2015-05-30T00:32:54+5:302015-05-30T00:32:54+5:30
'काम असेल कठीण, नसते कधी अशक्य, पूर्णविरामानंतर संपते पूर्ण वाक्य, नशिबाला दोष देत, संधी गमवू नको, ..

‘एटीएम'ची सुरक्षा करतात ‘भावी अधिकारी’
जिद्द : नोकरी ती नोकरी अन् परीक्षेचा अभ्यासही!
अमरावती : 'काम असेल कठीण, नसते कधी अशक्य, पूर्णविरामानंतर संपते पूर्ण वाक्य, नशिबाला दोष देत, संधी गमवू नको, काटेरी मार्ग असेल; पण ध्येय कधी सोडू नको.' या कवितेच्या ओळींना अनुसरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे ध्येयवेडे तरुण 'एटीएम'वर सुरक्षारक्षकाची नोकरी करीत ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मी अधिकारी होणार या दृढ निश्चयाने हे भावी अधिकारी आपली ड्यूटी पूर्ण करताना ध्येयाकडे एक-एक पाऊल टाकीत आहेत.
हे भावी अधिकारी आपल्या आर्थिक परिस्थितीशी झगडत भविष्याच्या वाटचालीसाठी प्रयत्न करीत आहेत. प्रत्येकाला चांगले घर, आरामदायी जीवन, पैसे, चांगले मित्र आणि सहकारी मिळतील याची खात्री नसते. हे सत्य असले तरी आपण आपल्या कायार्तून हे चित्र बदलू शकतो, हेही तितकेच सत्य आहे.
अनेक तरुण घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे नोकरी करीत शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळावी म्हणून दिवसरात्र एक करीत अभ्यास करतात. असेच हे ध्येयवेडे तरुण विविध ठिकाणी एटीएममध्ये ड्यूटी करीत अभ्यास करताना दिसून येतात. एटीएमवर सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे तरुण पूर्वी कंपन्यांमध्ये काम करीत होते; पण कंपनीमध्ये १२ ते १४ तास राबावे लागत असल्यामुळे अभ्यासाला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी सुरक्षारक्षकाच्या नोकरीला प्रधान्य दिले, असे या तरुणांनी सांगितले. शहरात विविध बँकांचे शेकडो एटीएम मशीन आहेत. चौकाचौकांत आणि रस्त्यांवर विविध बँकांचे एटीएम पाहावयास मिळतात.
या एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी बँकांनी खाजगी सुरक्षा एजन्सीला दिलेली असते. या संस्थांच्या माध्यमातून एटीएमवर सुरक्षारक्षक नेमले जातात. बहुतांश एटीएमची जबाबदारी तरुणांवर सोपवलेली आहे. अभ्यासाला पुरेसा वेळ आणि अथार्जन अशी दुहेरी उपलब्धी यातून होते.
रात्रपाळीस प्राधान्य
दिवसा नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे अभ्यास करता येत नाही. रात्री एटीएमवर पैसे काढण्यासाठी जास्त नागरिक येत नाहीत. त्यामुळे आम्ही रात्रपाळीस अधिक प्राधान्य देतो. त्यामुळे अभ्यासही चांगला होतो, असे शहरातील एका सुरक्षा रक्षकाने सांगितले.
६ ते ९ हजार पगार
एटीएमवर सुरक्षारक्षक म्हणून दररोज आठ तास काम केल्यानंतर महिन्याला ६ ते ९ हजार रुपये पगार मिळतो. या पैशांतून रूम भाडे, महिन्याचा खर्च केल्यानंतर क्लासची फी, पुस्तकांची खरेदी करतो, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.
विविध शाखांतील तरुण
डिप्लोमा, अभियांत्रिकी, आर्टस्, सायन्स, कॉर्मस, कृषी अशा विविध शाखांतील पदवीधर मुले सुरक्षारक्षक म्हणून काम करीत आहेत. ज्या तरुणांकडे एनसीसीचे ‘सी’ प्रमाणपत्र आहे, अशा तरुण कॅडेटस्ना सुरक्षारक्षक म्हणून नेमताना प्रधान्य देतो, असे एका सुरक्षारक्षक एजन्सीच्या अधिकाऱ्याने सांगितले.