तीन घरांसह चार गोठे खाक
By Admin | Updated: May 22, 2016 00:03 IST2016-05-22T00:03:03+5:302016-05-22T00:03:03+5:30
अचलपूर तालुक्यातील वासणी बु. येथे शनिवारी दुपारी ३.३० वाजता लागलेल्या आगीत तीन घरांसह चार गोठ्यांची राखरांगोळी झाली.

तीन घरांसह चार गोठे खाक
वासनी येथील घटना : तीन बकऱ्या ठार, गाय-वासरु होरपळले
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील वासणी बु. येथे शनिवारी दुपारी ३.३० वाजता लागलेल्या आगीत तीन घरांसह चार गोठ्यांची राखरांगोळी झाली. आगीत तीन बकऱ्या होरपळून मृत पावल्या. काही बकऱ्या वासरू व गाय हे पाळीव जनावरे जखमी झाले. विद्युत खांबावरून आगगोळे पडल्याने आग लागल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
सुनील श्रीकृष्ण विजारे, सुमित्रा विश्वनाथ बिजारे, दिनेश गंगाधर ठाकरे यांच्या घरांची आगीत राखरांगोळी झाली. सुनिता बिजारे यांच्या तीन बकऱ्या गोठ्यात जळून ठार झाल्या. सुभाष अंबादास ठाकरे, प्रकाश गंगाधर ठाकरे, मुरलीधर ठाकरे आदींचे गोठे जळून राख झाले.
वीज वितरण कंपनीमुळे आग
परतवाडा : या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली होती. आग लागताच अचलपूर व चांदूरबाजार येथील अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. तीन बंबांनी आग विझविण्यात आली. वासणी बु. येथे शनिवारी लागलेली आग विज वितरण कंपनीच्या हलगर्जीमुळे लागल्याचे सांगण्यात आले. सुनीता बिजारेंच्या घराशेजारील विज खांबावरुन दुपारी विद्युत तारांच्या घर्षणाने आगीचे गोळे खाली पडले. गोठ्याला आग लागताच हवेने घरांसह गोठ्यांना कवेत घेतले. आग लागताच गावात एकच हाहाकर माजला होता. विद्युत कंपनीचे तार जमिनीवर लोंबकळत असताना त्यावर दुर्लक्ष कोल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अचलपूरचे तहसीलदार मनोज लोणारकर, रामगुंडे, राजेश व्यवहारे, विजय गिरी, सोनार महसूल अधिकाऱ्यांनी तत्काल भेट देवून माहिती घेतली. (प्रतिनिधी)