अमरावतीच्या हॉटेलमध्ये आग; नागपूरच्या एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 23:01 IST2021-08-31T23:01:10+5:302021-08-31T23:01:55+5:30
Amravati news राजापेठ ठाण्यासमोरील हॉटेल इम्पेरियामधील इलेक्ट्रिक पॅनेलला आग लागल्यानंतर ऑक्सिजनअभावी एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ३ च्या सुमारास घडली.

अमरावतीच्या हॉटेलमध्ये आग; नागपूरच्या एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजापेठ ठाण्यासमोरील हॉटेल इम्पेरियामधील इलेक्ट्रिक पॅनेलला आग लागल्यानंतर ऑक्सिजनअभावी एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ३ च्या सुमारास घडली. दिलीप चंद्रकांत ठक्कर (५४, रा. जमुना क्रमांक ३, सीए रोड, नागपूर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मृताचे जावई चेतन तेली (एकनाथपुरम) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी हॉटेल संचालक रितेश लुल्ला (३२, रामपुरी कॅम्प) विरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेने हॉटेलमधील सुरक्षाव्यवस्था चव्हाट्यावर आली. (Fire at hotel in Amravati; Death of one from Nagpur)
इम्पेरिया या चार माळ्यांच्या हॉटेलमधील तिसऱ्या मजल्यावर १३ खोल्या असून, त्यासमोरच इलेक्ट्रिक पॅनेल आहे. त्याला रात्री २ नंतर शॉर्टसर्किटने आग लागली. ती आग धुमसत असतानाच धुराचा प्रचंड लोळ उठला. पुरेशी जागा नसल्याने तो धूर खोलीत शिरला. त्या अंधाऱ्या खोल्यांमध्ये व्हेंटिलेशन नव्हते.
धुराचे लोळ उठल्याने पळापळ झाली. पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने दिलीप ठक्कर यांचा गुदमरून मृत्यू झाला. आग ज्या ठिकाणी लागली त्याबाजूनेच बाहेर पडण्याचा चिंचोळा मार्ग होता. मात्र, ते पोहोचू शकले नाहीत.
२०२ मध्ये मिळाला मृतदेह
जीटीपीएल या केबल नेटवर्कचे विदर्भ व्यवस्थापक असलेले ठक्कर हे खोली क्रमांक २०५ मध्ये थांबलेले होते. त्यांचे पुण्याचे सहकारी दीपेश शहा हे बाजूच्या खोलीत होते. पळापळ झाली तेव्हा, ठक्कर खोलीतून बाहेर पडले. मात्र, पॅसेजमध्ये अंधार व धूर साचल्याने ते बाहेर पडू शकले नाहीत. त्यांचा मृतदेह खोली क्रमांक २०२ मध्ये आढळून आला.
‘ते’ पाच जण सुखरूप
हाॅटेलच्या सहा रूममध्ये सहा ग्राहक होते. पैकी दुबे, शेलार, पाटील, चौरसिया व शहा या पाच जणांना राजापेठ पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले. ठाणेदार मनीष ठाकरे व त्यांची टीम लागलीच घटनास्थळी पोहोचली. पीएसआय कृष्णा मापारी, कर्मचारी दुलाराम देवकर, अमोल खंडेझोड, राहुल ढेंगेकर, नीलेश पोकळे, अतुल संभे, दानिश शेख, प्रशांत गिरडे, ढवळे यांनी प्राणाची बाजी लावत त्यांना हॉटेलबाहेर काढले.