कर्मचारी दोषी, अधिकारी निर्दोष कसे?
By Admin | Updated: June 18, 2014 23:50 IST2014-06-18T23:50:50+5:302014-06-18T23:50:50+5:30
घरफोड्यांचे सत्र थांबविण्यात अमरावती शहर पोलीस दलाला सपशेल अपशय आले असताना, सुरक्षा प्रदान करू न शकणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांपैकी एकाही अधिकाऱ्यावर पोलीस आयुक्तांनी कारवाई केलेली नाही.

कर्मचारी दोषी, अधिकारी निर्दोष कसे?
दुजाभाव : ३६ शिपायांवर कारवाई, वरिष्ठांना सारेच माफ
गणेश देशमुख - अमरावती
घरफोड्यांचे सत्र थांबविण्यात अमरावती शहर पोलीस दलाला सपशेल अपशय आले असताना, सुरक्षा प्रदान करू न शकणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांपैकी एकाही अधिकाऱ्यावर पोलीस आयुक्तांनी कारवाई केलेली नाही. आंधळ्यांनाही दिसावा असा कसूर अधिकाऱ्यांच्या कर्तव्यात असतानाही पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना पाठीशी का घालतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अमरावती शहरातील सामान्य नागरिक कमालीचा भयभीत आहे. एप्रिल महिन्यात २७, मे महिन्यात २५, जून महिन्यात १६ चोऱ्या-घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत चोरीचे ३३६ अािण घरफोडीचे ११९ गुन्हे घडले आहेत. अनेक वस्त्यांमध्ये चोर दिसतात. सतर्क नागरिकांमुळे त्यांना पोबारा ठोकावा लागतो. चोर कधीही येईल, या धास्तीमुळे सामान्य नागरिक कायम दहशतीत आहे. घराला मजबूत कडीकोंडे लावणे, लोखंडी दरवाजे लावणे, ग्रील, चॅनेलगेट लावणे असले उपाय करून सामान्यजनांनी स्वत: शक्य ती उपाययोजनी करवून घेतली. बाहेरगावी जाण्याचा बेत अनेकांनी रद्द केला; तथापि चोऱ्या थांबतच नाहीत म्हटल्यावर रात्री नागरिकांचा डोळा लागणार तरी कसा?
एक-दोन नव्हे, चोऱ्यांचे सत्र लागोपाठ सुरू आहे. दोन हजार पोलिसांच्या फौजेचा प्रमुख असलेल्या पोलीस आयुक्तांना, अधिनस्थ अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मान खाली घालावी लागत आहे. तरीही सुरेशकुमार मेकला यांनी एकाही अधिकाऱ्यावर कठोर कारवाई का करू नये, हा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
गुन्हे शाखेच्या १९ आणि कोतवाली पोलीस ठाण्याच्या १७ कर्मचाऱ्यांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला. कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी हजार आणि कोतवाली पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड या कारवाईअंतर्गत वसूल करण्यात आला. हे कर्मचारी अकार्यक्षम असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. आमचा सवाल त्याही पुढचा आहे. प्रत्येक ठाण्याचा प्रमुख हा ठाणेदार असतो. ठाणेदार योग्यरीत्या कर्तव्य बजावतात की नाही याचे निरीक्षण करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त अर्थात एसीपींची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एसीपी आणि पोलीस ठाणी योग्यरीत्या कर्तव्य बजावतात की नाही, यावर नजर ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्तांची नेमणूक करण्यात आलेली आहे. शहरात १० ठाणी आहेत. एसीपींची पाच कार्यालये आहेत. त्यापैकी चार कार्यरत आहेत. तीन डीसीपी आहेत.