डोळ्यांशिवाय पाहिलेले मयुरचे स्वप्न पूर्ण
By Admin | Updated: June 17, 2014 23:57 IST2014-06-17T23:57:31+5:302014-06-17T23:57:31+5:30
आधीच आर्थिक विपन्नावस्था त्यात जन्मांधपणाचा शाप. पण, त्याने हार मानली नाही. शारीरिक वैगुण्यावर मात करून उज्ज्वल यश संपादन करण्याचे त्याचे स्वप्न होते. दहावीचा निकाल घोषित झाला

डोळ्यांशिवाय पाहिलेले मयुरचे स्वप्न पूर्ण
अमरावती : आधीच आर्थिक विपन्नावस्था त्यात जन्मांधपणाचा शाप. पण, त्याने हार मानली नाही. शारीरिक वैगुण्यावर मात करून उज्ज्वल यश संपादन करण्याचे त्याचे स्वप्न होते. दहावीचा निकाल घोषित झाला अन् ८५.६० टक्के गुणांसह त्याचे हे डोळ्यांशिवाय पाहिलेले स्वप्नही पूर्ण झाले.
स्थानिक सायन्सकोर (जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळा)चा विद्यार्थी मयूर गणेश गवळी याची ही प्रेरणादायी यशोगाथा. मयूरला शिक्षणाची प्रचंड ओढ. त्यासाठी त्याला लहानपणापासूनच आई-वडिलांपासून लांब रहावे लागले. भविष्यात प्रध्यापक होण्याचे स्वप्न उराशी घेऊन तो लढत राहिला. इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण त्याने स्थानिक डॉ. नरेंद्र भिवापुरकर अंध विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्याने सायन्सोकरच्या शाळेत प्रवेश घेतला. सध्याही तो अंध विद्यालयाच्या वसतिगृहातच राहतोय. दहावीची परीक्षा उत्तम गुणांसह उत्तीर्ण करण्याचे त्याचे ध्येय होते. त्यासाठी त्याने जिद्दीने रात्रीचा दिवस करून अभ्यास केला. अखेरीस त्याची दुर्दम्य महत्वाकांक्षा आणि प्रचंड परिश्रमांना यश आले. अतिशय विपरीत परिस्थितीत कोणतीही शिकवणी नसतांना इतकेच नव्हे तर नेत्रहिन असूनही त्याने दहावीची कठीण परीक्षा ८५.६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केली.
नागपुरच्या बुटीबोरी येथील रहिवासी गणेश व प्रमीला गवळी या मयूरच्या मातापित्यांचा आनंद आज गगनात मावेनासा झालाय. त्याची बहिण पुनम हिला देखील भावाच्या यशामुळे आकाश ठेंगणे झालेय. मयूरला त्याच्या या यशाचे गमक विचारले असता त्याने यशाचे बहुतांश श्रेय त्याची मावशी इंदूबाई तिरळकर यांना दिले. इंदूबाई तिरळकर गोपालनगर नजीकच्या पवन नगर येथे राहतात. आई-वडिलांच्या अपरोेक्ष मावशीने दिलेल्या पाठबळामुळेच आपण हे यश मिळवू शकलो, असे मयूरने आवर्जून सांगितले. शिकवणी नसल्याने शाळेतील अभ्यासक्रमाच्या भरवशावरच त्याने परीक्षा दिली. याकामी त्याला वर्गशिक्षकांचे भरघोस सहकार्य मिळाले. माध्यमिक शालांत परीक्षेत मयूरला ५०० पैकी ४२८ गुण मिळाले आहेत. मयूरने त्याच्या यशाचे श्रेय आई- वडिल, इंदूबाई तिरळकर,यशवंत तिरळकर, मावस बहिण विजया पेठेकर, शिक्षक महादेव तायडे, प्रज्ञा रामटेके, वसुंधरा काळे आणि वसतिगृहाचे प्राचार्य नवनाथ इंगोले व अधीक्षक पंकज मुदगल यांना देतो.