२० हजार एकरावर दुबार पेरणीचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:01 IST2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:01:14+5:30
शेतकऱ्यांच्या मागे संकटांचे शुक्लकाष्ठ हात धुऊन लागले आहे. गतवर्षीचे सोयाबीन अतिवृष्टीने खराब झाल्याने शेतकऱ्यांनी कंपन्यांचे महागडे बियाणे घेतले. महाबीजची ३० किलोची बॅग २३४० रुपयांना आहे. अन्य कंपन्यांचेही बियाणेही दरात वरचढ आहेत. आर्थिक अडचणीतील शेतकºयांनी पदरमोड करून बियाणे खरेदी केले. मात्र, पेरलेले महागडे बियाणे उगवलेच नाही.

२० हजार एकरावर दुबार पेरणीचे सावट
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी किमान २० हजार एकरातील सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याचीे धक्कादायक माहिती आहे. महाबीजसह काही खासगी कंपन्यांनी चक्क वांझोटे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. आठवडाभरात किमान ५०० तक्रारी याबाबत कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत व त्यांचा ओघ सुरूच आहे.
शेतकऱ्यांच्या मागे संकटांचे शुक्लकाष्ठ हात धुऊन लागले आहे. गतवर्षीचे सोयाबीन अतिवृष्टीने खराब झाल्याने शेतकऱ्यांनी कंपन्यांचे महागडे बियाणे घेतले. महाबीजची ३० किलोची बॅग २३४० रुपयांना आहे. अन्य कंपन्यांचेही बियाणेही दरात वरचढ आहेत. आर्थिक अडचणीतील शेतकºयांनी पदरमोड करून बियाणे खरेदी केले. मात्र, पेरलेले महागडे बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. मोर्शी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, अचलपूर, अंजनगाव सुर्जी व चांदूरबाजार तालुक्यात महाबीजसह इतर काही कंपन्याचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारींचा कृषी विभागाकडे वाढता ओघ आहे. या अनुषंगाने १९ जूनपासून तालुकास्तरीय समितीद्वारे पाहणी सुरू झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
सोयाबीनचे पीक १०५ ते ११० दिवसांचे असताना, विविध कंपन्यांचे ९३०५ हे वाण ९५ दिवसांच्या कालावधीत येत असल्याने ‘अर्ली व्हेरायटी’ या नावाने ओळखले जाते. सोयाबीननंतर रबीचा गहू व हरभरा घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. अलीकडे सोयाबीनचा हंगाम हा पावसात सापडतो. त्यापूर्वीच पीक हाती यावे, या उद्देशानेही शेतकऱ्यांनी या वाणाची पेरणी केली. पेरणीपश्चात तीन ते चार दिवस शेतकऱ्यांनी बीजांकुराची वाट पाहिली. मात्र, बहुतेक शेतात या वाणाची उगवण झाली नाही. वांझोट्या बियाण्यांमुळे दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.
काही लॉटमधील बियाणे खराब
बियाणे उगवण झाल्यावर पिकांनी माना टाकल्या असत्या, तर ती वेगळी गोष्ट ठरली असती. बियाण्यांची उगवण कमी पावसाने झालेली नाही किंवा जास्त पावसाने बियाणे दडपल्याचाही कंपन्यांचा दावा खोटा असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. बियाण्यांच्या लॉटपैकी काही लॉटमध्ये उगवण झाली नसल्याची बाब महाबीजसह कृषी विभागानेदेखील मान्य केली आहे. काही कॉमन लॉटबाबतच्या तक्रारी झाल्यात. याविषयी अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकांनी सांगितले.
बियाणे खोल
पडल्याचा दावा खोटा
रोहिणीत मान्सूनपूर्व पावसानंतर शेतकºयांनी दोन वेळा पट्टीपास केल्याने जमीन भुसभुशीत झाली व बियाणे खोल पडले. त्यामुळे उगवण झालेली नाही व काही ठिकाणी पेरणीपश्वात खोलवर असलेला बियाण्यांवर मातीचा जाड थर आल्याने उगवण झाली नसल्याचा युक्तिवाद बियाणे कंपन्यांंद्वारे केला जात आहे. मात्र, शेतकºयांनी ही बाब नाकारली. या सर्व प्रक्रियेत उगवण झालेली नसल्यास ती ओळखता येते. मात्र, सार्वत्रिक उगवण झालेली नसल्याने बियाणे खराब असल्याचा आरोप शेतकºयांनी केलेला आहे.
सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याबद्दल शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त आहेत. याबाबत उपविभागीय कृषी अधिकारी व संबंधित तालुका समितीद्वारे क्षेत्रपाहणी सुरू आहे. कमी पावसाने काही भागात उगवण झालेली नाही.
- शैलेश नवाल
जिल्हाधिकारी
ड्राय स्पेलनंतर तक्रारी वाढत आहेत. तपासणी सुरू आहे. याविषयी तालुकास्तरीय समितीचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल. काही लॉटमध्ये तक्रारी आहेत. बियाण्यांचा दोष असल्यास नियमानुसार कार्यवाही होईल.
- एस.पी. देशमुख
जिल्हा व्यवस्थापक, महाबीज
प्राप्त तक्रारींची तालुकास्तरीय समितीद्वारे पाहणी सुरू आहे. बियाण्यांमध्ये दोष असल्यास शेतकºयांचा हंगाम खराब जाऊ नये, यासाठी कंपन्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून बियाणे बदलून द्यावे.
- विजय चवाळे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी