कुणी कापूस घेता का कापूस?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:01 IST2020-05-10T05:00:00+5:302020-05-10T05:01:08+5:30
वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कापसाची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. ३० एप्रिल या मुदतीपर्यंत ३ हजार ८२९ शेतकºयांनी नोंदणी केली. या हंगामातील त्या शेतकऱ्यांसह जुने ६४६ असे एकूण ४४७५ शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. पैकी ५ मेपर्यंत २८९ गाड्यांची मोजणी झाली. राहिलेला कापूस कधी मोजणार, हा प्रश्न तूर्त अनुत्तरित आहे.

कुणी कापूस घेता का कापूस?
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा बाजार : वरूड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतले जाते. पण, खेडा खरेदीमध्ये कापसाला कमी भाव असल्याने शेतकऱ्यांचा कल पणन संघाला कापूस विकण्याकडे होता. मात्र, त्या खरेदीला लॉकडाऊनचा अडसर आल्याने अजूनही शेतकऱ्यांकडे ७० टक्के कापूस घरातच पडून आहे. ‘कुणी कापूस घेता का कापूस ? असे म्हणण्याची वेळ लॉकडाऊनमध्ये अडवणूक झालेल्या शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.
वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कापसाची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. ३० एप्रिल या मुदतीपर्यंत ३ हजार ८२९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. या हंगामातील त्या शेतकऱ्यांसह जुने ६४६ असे एकूण ४४७५ शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. पैकी ५ मेपर्यंत २८९ गाड्यांची मोजणी झाली. राहिलेला कापूस कधी मोजणार, हा प्रश्न तूर्त अनुत्तरित आहे.
खरीप हंगाम आता दीड-दोन महिन्यांवर आला आहे. त्यामुळे खरिपातील पेरणीसाठी शेतीची मशागत, बियाणे व खताच्या खरेदीसाठी शेतकºयांकडून पैसे जुळवण्यासाठी आटापिटा होत आहे. असे असताना शेतकºयांचा माल घरात पडून आहे. नवीन हंगामाची तयारी रासायनिक खते, बी-बियाणांची जुळवाजुळव करायची असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
कापसामुळे सुटली खाज
उन्हाळा दिवसेंदिवस तीव्र होत असताना कापसामुळे खाजेसारखे त्वचाविकार उद्भवू लागले आहेत. यामुळे शासनाने तातडीने कापूस खरेदीचा वेग वाढवून शेतकºयांना चिंतामुक्त करावे व कापूसकोंडी फोडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
क्विंटलमागे एक हजारांचे नुकसान
खुल्या बाजाराचे भाव ४४०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल, तर शासकीय दर ५४५० रुपये प्रतिक्विंटल असा आहे. त्यामुळे खुल्या बाजारात कापूस विकल्यास प्रतिक्विंटल १ हजार रुपयांचे नुकसान होत आहे.
आर्थिक व्यवहार खुंटला
शेतकºयांकडे सध्याच्या घडीला काही ना काही शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध आहे. तथापि, संचारबंदीच्या बडग्याने बाजारात नेण्याची सोय नाही आणि खासगीत विकण्याने नुकसानाची हमी, अशा दुहेरी पेचात शेतकरी अडकले आहेत. त्यात लॉकडाऊनमुळे खर्चही कमी झालेले नाहीत. शिल्लक शेतमाल हा शेतकऱ्यांकरिता जमापुंजी नव्हे, तर डोकेदुखी ठरू लागला आहे.
आम्ही पणन महासंघाशी नुकताच पत्रव्यवहार केला. बाजार समिती शेतकरीहिताचेच निर्णय घेईल.
- अजय नागमोते
सभापती, बाजार समिती, वरुड
वरूडमध्ये येत्या दोन दिवसांत एक नवीन खरेदी केंद्र सुरू करू. त्यामुळे खरेदीचा वेग वाढेल. शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
- देवेंद्र भुयार
आमदार, मोर्शी
खुल्या बाजारात कापसाचे भाव वाढतील, या आशेने हजारो क्विंटल कापूस घरातच आहे. खते, बियाणे खरेदी करावयाची आहे. शासनाने खरेदीचा वेग वाढवावा.
- सुरेंद्र ठाकरे, शेतकरी, हातुर्णा