२२ केंद्रांमध्ये अडीच हजार थाळ्यांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:01 IST2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:01:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी शिवभोजन थाळीचे दर पाच रुपये करण्यात आलेले आहेत. या केंद्रांवरून अडीच ...

२२ केंद्रांमध्ये अडीच हजार थाळ्यांचे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी शिवभोजन थाळीचे दर पाच रुपये करण्यात आलेले आहेत. या केंद्रांवरून अडीच हजार थाळ्यांचे वितरण होत आहे.
जिल्ह्यात शिवभोजन योजनेंतर्गत २२ केंद्रे कार्यरत आहेत. परतवाडा येथे अनिल उपाहारगृह व बाजार समितीतील ज्ञानेश्वरी उपाहारगृह, धामणगाव रेल्वे येथे भगतसिंह चौकातील गणेश भोजनालय, तसेच अंबिका भोजनालय, तिवसा तालुक्यात तळेगाव ठाकूर गोदावरी महिला बचत गट, दयार्पूरला बसस्थानकानजिक गोपाळ हॉटेल व कृषी उत्पन्न बाजार समितीनजिक प्रसाद उपाहारगृह, धारणीला बसस्थानकानजिक गुरूकृपा भोजनालय, नांदगाव खंडेश्वर येथे चव्हाळे भोजनालय व बसस्थानकानजिक राणा उपाहारगृह, चांदूर बाजार येथे बसस्थानकानजिक राहूल बहुउद्देशीय शिक्षण संस्था, चांदूर रेल्वे येथे राजश्री फॅमिली गार्डन येथे शिवभोजन थाळी उपलब्ध आहे.
अमरावतीत डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय परिसरात महालक्ष्मी उपाहारगृह, जिल्हा रुग्णालयात आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ उपक्रम, कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी भोजनालय, एसटी उपाहारगृह, सरोज चौकात महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह कन्झुमर्स फेडरेशन उपक्रम, भातकुली बसस्थानकानजिक साई योगी फॅमिली गार्डन उपाहारगृह, अंजनगाव सुर्जी येथे समता भोजनालय, वरूड येथे बसस्थानकामागे यशवंत महिला केटरर्स, मोर्शी येथे बसस्थानकासमोर यशवंत महिला केटरर्स आदिवासी बचत गट येथे शिवभोजन थाळी उपलब्ध आहे. चुरणी येथे स्व. हरिराम बाबुलाल बहुउद्देशीय शिक्षण संस्था येथेही थाळी उपलब्ध असून, स्थानिक बांधव त्याचा लाभ घेत आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी दिली. शिवभोजन केंद्र चालकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे अनिवार्य केल्याचे टाकसाळे यांनी सांगितले.
केंद्रचालकांना अनुदान, गरजवंतांना लाभ
लॉकडाऊनच्या काळात शहरी भागात ५० रुपये प्रतिथाळी, ग्रामीण भागात ३५ रुपये असे दर आहे. त्याव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून केंद्रचालकाला देण्यात येते. शहरी भागात अनुदानाची ही रक्कम ४५, तर ग्रामीण भागात ३० रुपये इतकी आहे. लॉकडाऊन काळात या सर्वांच्या जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून योजनेतील थाळीची किंमत तीन महिन्यांसाठी प्रतिथाळी ५ रुपये इतकी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना यामुळे मोठी मदत झाली असून अनेक गरजवंत या योजनेतील थाळीचा लाभ घेत आहेत.